NCP चे 9 आमदार संपर्कात:- BJP खासदार रणजित निंबाळकर

सध्या महाशिवआघाडी सरकार स्थापनेच्या जवळ जात असताना भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असून यातूनच असे दावे पुढे येऊ लागले आहेत. रणजीत निंबाळकरांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादीचे 9 आमदार जर भाजपमध्ये गेले तर पक्षांतर कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. त्यामुळे खासदार रणजीत निंबाळकर यांचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे.

मुंबई : एका बाजूला माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी भाजपचे सरकार बनविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जाणार असल्याचा दावा केला  असताना माढ्याचे खासदार रणजित निंबाळकर यांनी आपल्या संपर्कात राष्ट्रवादीचे 9 आमदार असल्याचा खळबळजनक दावा  केला आहे.

राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर आमदार फुटीची चर्चा रंगली आहे. माढा येथे पीक नुकसान पाहणीसाठी खासदार रणजित निंबाळकर आले असता प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि अजित पवार यांच्यावर निशाणा साधला. नऊ आमदार भाजपमध्ये आल्यानंतर त्यांच्या मतदार संघांमध्ये पोटनिवडणुका झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेसला उमेदवार मिळणार नाहीत, असा विश्वास निंबाळकर यांनी व्यक्त केला.

सध्या महाशिवआघाडी सरकार स्थापनेच्या जवळ जात असताना भाजपच्या गोटात प्रचंड अस्वस्थता असून यातूनच असे दावे पुढे येऊ लागले आहेत . साताऱ्याचे खासदार उदयन महाराज यांचा अनुभव समोर असताना आता राष्ट्रवादीचा एकही आमदार फुटण्याची शक्यता नसल्याने पहिल्या दिवसापासून राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांना शिवसेना आणि काँग्रेसप्रमाणे कोणत्याही बंधनात किंवा राज्या-परराज्यातील रिसॉर्टवर ठेवण्यात आलेलं नाही. एका बाजूला कर्नाटकच्या निकालाने फुटाफुटी झाली तर पुन्हा निवडणुकीला सामोरे जावे लागणार याचा अंदाज प्रत्येक आमदाराला असताना निंबाळकर यांचा दावा सध्या तरी प्रसिद्धीसाठी खळबळ माजविण्याचा प्रयत्न असल्याचे दिसत आहे.

पक्षांतरबंदी कायद्यानुसार एकूण सदस्य संख्येच्या दोन तृतीयांश सदस्यांनी पक्षांतर केले तरच सदस्यत्व कायम राहू शकते. सध्या राष्ट्रवादीचे 54 आमदार निवडून आले आहेत. पक्षांतर कायद्यानुसार राष्ट्रावादीच्या किमान 36 आमदारांनी पक्षांतर केले तरच त्यांचे सदस्यत्व कायम राहू शकते.

रणजीत निंबाळकरांच्या दाव्यानुसार राष्ट्रवादीचे 9 आमदार जर भाजपमध्ये गेले तर पक्षांतर कायद्यानुसार त्यांचे सदस्यत्व रद्द होईल. त्यामुळे खासदार रणजीत निंबाळकर यांचा दावा संभ्रम निर्माण करणार आहे.

कर्नाटकच नाही तर अनेक राज्यांमध्ये भाजपमध्ये वेळोवेळी आमदारांची आयात होत राहिली आहे. गोव्यामध्ये काँग्रेसच्या 15 आमदारांपैकी तब्बल 10 आमदार भाजपमध्ये सामील झाले. ही संख्या दोन तृतीयांशपेक्षा जास्त असल्यानं येथे पक्षांतरबंदी कायद्याचा फटकाही भाजपला बसला नाही. आता हेच ऑपरेशन लोटस महाराष्ट्रातही पाहायला मिळणार का? अशी चर्चा आहे. कारण गोवा, मणिपूर आणि कर्नाटकचा इतिहास अजूनही ताजा आहे. त्या तुलनेत विरोधकांना ‘ऑपरेशन लोटस’ फेल ठरवायचं असेल तर जीवतोड मेहनत करावी लागेल.

Latest News