कोरोनाचे रुग्ण तिसऱ्या टप्प्याला सुरुवात?

नवी दिल्ली: देशातील कोरोनाबाधितांची संख्या ६० हजारांच्या जवळ पोहोचली आहे. आतापर्यंत २०० हून अधिक जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तर दुसरीकडे देशातल्या जवळपास ७५ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णांची झपाट्यानं वाढते आहे. त्यामुळे आता भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद (आयसीएमआर) या जिल्ह्यांमधल्या परिस्थितीचा आढावा घेणार आहे. या जिल्ह्यांमध्ये कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाली आहे का, याचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे. सिवियर ऍक्युट रेस्पिरेटरी इलनेस (एसएआरआय) म्हणजेच श्वासोच्छवास घेताना येणाऱ्या समस्या आणि इन्फ्लुएंजासारख्या आजारांचा (आयएलआय) सामना करणाऱ्या प्रत्येक जिल्ह्यातल्या किमान २५० जणांच्या तपासण्या करण्याचे आदेश केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सगळ्या राज्यांना दिले आहेत. कोरोना विषाणूच्या संक्रमणावर नजर ठेवण्यासाठी मंत्रालयाकडून हे आदेश देण्यात आले आहेत. कोरोना रुग्णांची संख्या जास्त असलेल्या जिल्ह्यांमध्ये अँटी बॉडी किट्सच्या माध्यमातून जास्तीत जास्त जणांची तपासणी करण्याची योजना आयसीएमआरनं आखली होती. मात्र या किट्समधून मिळणाऱ्या निष्कर्षांमध्ये विसंगती आढळून येऊ लागल्यानं ही योजना गुंडाळण्यात आली. आता देशातल्या ७५ जिल्ह्यांमध्ये ईएलआयएसए (एंजाइम लिंक्ड इम्युनोसॉर्बेंट असे) टेस्ट किट्सच्या माध्यमातून चाचण्या घेऊन त्यातून मिळणाऱ्या आकडेवारीचा अभ्यास आयसीएमआरकडून केला जाणार आहे. ईएलआयएसए टेस्ट किट्सदेखील अँटी बॉडी किट्स प्रमाणेच काम करतं. व्यक्तीच्या शरीरातील रक्तात अँटी बॉडी किती प्रमाणात सक्रिय आहेत, त्याची तपासणी ईएलआयएसए किट्सच्या माध्यमातून केली जाते. अद्याप या किट्सला आयसीएमआरनं मंजुरी दिलेली नाही. कम्युनिटी ट्रान्समिशन सुरू झालं आहे का, ते तपासण्यासाठी आयसीएमआरनं मार्चमध्येही अशाच प्रकारे आढावा घेतला होता. देशात कोरोनाच्या कम्युनिटी ट्रान्समिशनला सुरुवात झाल्याचे पुरेसे पुरावे नसल्याचं आयसीएमआरनं आतापर्यंत अनेकदा म्हटलं आहे.

Latest News