कथक नृत्यसंध्या’ कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती—‘मनीषा नृत्यालय’च्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त वैविध्यपूर्ण नृत्य सादरीकरण


*’कथक नृत्यसंध्या’ कार्यक्रमात बहारदार नृत्य प्रस्तुती—‘मनीषा नृत्यालय’च्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त वैविध्यपूर्ण नृत्य सादरीकरण
पुणे :ज्येष्ठ नृत्यगुरू पं .मनीषा साठे यांच्या ‘मनीषा नृत्यालय’संस्थेतर्फे ‘कथक नृत्यसंध्या’ या कार्यक्रमाचे आयोजन शुक्रवार,दि.२२ डिसेंबर रोजी सायंकाळी बालगंधर्व रंगमंदिर येथे करण्यात आले होते.
‘मनीषा नृत्यालय’च्या ४८ व्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या बहारदार नृत्य सादरीकरणाला रसिकांनी भरभरून दाद दिली.त्यात मनीषा साठे तसेच त्यांच्या १५० शिष्यांच्या वैविध्यपूर्ण नृत्य रचनांचे विलोभनीय सादरीकरण झाले .
मनीषा साठे यांनी शिवस्तुती, पारंपारिक ताल, बनारस घराण्याच्या रचना आणि चक्री प्रस्तुत केल्या आणि उपस्थितांची वाहवा मिळविली.आजच्या सादरीकरणाचे नृत्त, अभिनय हे दोन्ही भाग संस्मरणीय ठरले . चतरंग ,तराणा, सरगम, कवित्त माला हेही सादर करण्यात आले. लोकनृत्य देखील सादर करण्यात आली.
सुप्रिया चित्राव यांनी सूत्रसंचालन केले.ज्येष्ठ कीर्तनकार चारुदत्त आफळे, सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ननावरे, सरपंच विनायक गायकवाड या पालकांचा त्यांच्या विशेष कामगिरीबद्दल सत्कार करण्यात आला .श्रीमती प्रतिभा शाहू मोडक, रवींद्र दुर्वे, लीलाताई गांधी, रजनी भट, जयमाला इनामदार, सुहासिनी देशपांडे,डॉ. शारंगधर साठे, क्षमा वैद्य हे मान्यवर उपस्थित होते.
*नृत्य समर्पित ‘मनीषा नृत्यालय’*ज्येष्ठ नृत्यगुरू मनीषा साठे यांनी ‘मनीषा नृत्यालय’या नृत्य प्रशिक्षण संस्थेची स्थापना केली.गेली ४७ वर्ष सातत्याने विद्यालयातल्या प्रत्येक विद्यार्थिनीला आपली कला प्रस्तुत करण्यासाठी रंगमंच उपलब्ध करून दिला जातो,
त्यातले हे ४८वे वर्ष आहे. मनीषा नृत्यालयातल्या विद्यार्थिनींनी पुणे विद्यापीठ, भारती विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ येथून बीए आणि एमए या पदव्या मिळवल्या आहेत. भारत सरकारची सीसीआरटीची स्कॉलरशिपही अनेक मुलींना मिळाली आहे
. मनीषा नृत्यालयातल्या विद्यार्थिनी दूरदर्शनच्या मान्यता प्राप्त कलाकार आहेत. मनीषा नृत्यालयातल्या विद्यार्थीनीनी देशात आणि परदेशातही विविध महोत्सवांमध्ये नृत्य प्रस्तुती करत आहेत .या सर्वांना मनीषा साठे यांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळत आहे. मनीषा नृत्यालय गरजू विद्यार्थिनींना सर्वतोपरी मदत करून आपली सामाजिक बांधिलकी जपत आले आहे.