निडकोच्या माध्यमातूनमहिला, युवक आणि शेतकरी यांना सक्षम करण्यास प्रयत्नशील …..डॉ. भारती चव्हाण

पिंपरी (दि. 13 ऑक्टोबर 2021) प्रशासन व्यवस्था, शासकीय योजना, संबंधित अधिकारी, गरजू व्यक्ती आणि संस्था यांचा उत्तम समन्वय साधून संघटन केल्यास खूप मोठे कार्य उभे राहू शकते. भारतात अजूनही शेती हाच मुख्य व्यवसाय आहे. शेतीला उद्योगाचा दर्जा मिळाल्यास केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनांचा याला फायदा होईल. त्यामुळे शेतीवर अवलंबून असणा-या महिलांचे वेगाने आर्थिक आणि सामाजिक सक्षमीकरण होईल.यासाठी निडको आणि नाबार्डच्या माध्यमातूनमहिला, युवक आणि शेतकरी यांना सक्षम करण्याचे प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भारती चव्हाण यांनी केले. डॉ. भारती चव्हाण यांची ‘राष्ट्रीय उद्योजकता आणि औद्योगिक विकास महामंडळ’ (NEIDCO) च्या पश्चिम भारतच्या सल्लागार संचालक पदावर नुकतीच नियुक्ती करण्यात आली. महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व राष्ट्रीय प्रमुख समीर सिंग यांनी डॉ. भारती चव्हाण यांना 9 ऑक्टोबर रोजी नियुक्ती पत्र दिले. (National Entrepreneurship and Industrial Development Corporation) (NEIDCO) नीडको हि संस्था केंद्र सरकारच्या नाबार्ड आणि उद्योग मंत्रालय अंतर्गत एम.एस.एम.ई. स्वतंत्र मंत्रालयाचा भाग (Medium, Small, Micro, Entrepreneurship) आहे. यामधून उद्यम मित्र, स्टॅण्ड अप, मुद्रा या योजनांमधून गरजू व्यक्ती, संस्था यांना कर्ज सहाय्य मिळवून देणे तसेच विपणन, वितरण मार्गदर्शन केले जाते. नियुक्तीनंतर डॉ. भारती चव्हाण माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधताना म्हणाल्या की, मध्यम, लघु, सुक्ष्म आणि आंत्रप्रेन्युअर्स (MSME) अंतर्गत ‘NEIDCO’ च्या माध्यमातून केंद्र सरकारच्या विविध योजनांचा लाभ शेती आणि शेतीपुरक व्यवसायांना मिळवून देण्यासाठी मी विशेष प्रयत्न करणार आहे. शेती उत्पादनांचा चांगला दर्जा राखल्यास विपणन आणि वितरण व्यवस्थित झाल्यास शेतकरी कुटूंब आर्थिक सक्षम होतील. यासाठी प्रथम शेती संबंधित कंपन्यांचे संघटन करावे लागेल. त्यामध्ये प्रक्रिया उद्योगाला चालना द्यावी लागेल. यातून मोठ्या प्रमाणात रोजगार उभा राहिल. यासाठी आवश्यक तेवढा पतपुरवठा करण्यासाठी केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत. या योजनांचा लाभ घेऊन स्थानिक पातळीवरील शेती उत्पादने, प्रक्रिया केलेली उत्पादने मोठ्या शहरांमध्ये तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत विक्रीसाठी उपलब्ध करुन देता येतील. हे सर्व करण्यासाठी महिलांचे प्रबोधन, शिक्षण आणि संघटन होणे आवश्यक आहे. यासाठी निडकोच्या माध्यमातूनमहिला, युवक आणि शेतकरी यांना सक्षम करण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन डॉ. भारती चव्हाण यांनी केले. प्रथम महिलांनी ‘मी महिला आहे’ हा न्यूनगंड बाळगणे बंद केले पाहिजे. आता महिलांना कोणतेही आरक्षण नको, महिलांमध्ये क्षमता आहेत. त्यांना फक्त समान संधी मिळाली पाहिजे. राजकीय, सामाजिक अशा सर्वच क्षेत्रात महिलांनी आपला ठसा उमटवला आहे. आता शेतीसह उत्पादन, विक्री आणि प्रक्रिया उद्योगात देखिल महिलांनी पुढे येऊन केंद्र सरकारच्या या योजनांचा फायदा घेऊन आणखी आर्थिक सक्षम व्हावे. महिला आर्थिक सक्षम झाली तर कूटूंब आर्थिक सक्षम होईल. कुटूंब आर्थिक सक्षम झाले तर बेरोजगारीवर विजय मिळवता येईल असेही डॉ. भारती चव्हाण म्हणाल्या.——————–