भाजपला खिंडार; पक्षाच्या माजी नगरसेवक, पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश चिंचवडची जनता भाजपला धडा शिकवेल – अजित पवार


पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – दि. १८ – भारतीय जनता पक्षाच्या भ्रष्ट कारभाराला कंटाळून त्या पक्षाच्या अनेक माजी नगरसेवकांनी आज राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. त्यामुळे ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपला खिंडार पाडत अजित पवार यांनी त्या पक्षाच्या नेत्यांना 440 व्होल्टचा आज (दि. १८) झटका दिला. या धक्क्याने अख्य्या चिंचवड विधानसभेत खळबळ निर्माण झाली असून भाजप बॅकफूटवर गेला आहे. दरम्यान अत्यवस्थ असलेल्या लोकप्रतिनिधींना प्रचाराला आणि मतदानाला बोलावणाऱ्या या स्वार्थी आणि भ्रष्ट भाजप नेत्यांनीच भावनेचा बाजार मांडल्याने चिंचवडची निवडणूक ही भावनिकतेवर नव्हे तर विकासकांच्या जोरावर जिंकू असा विश्वासही अजित पवार यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.
महाविकास आघाडीचे चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या प्रचारार्थ आयोजित भव्य सभेत अजित पवार बोलत होते. यावेळी त्यांनी राज्यकर्त्यांसह शहर भाजपच्या धोरणांचा आणि भ्रष्ट कारभाराचा आपल्या खास शैलीत समाचार घेतला. या सभेतच
माजी नगरसेवक तुषार कामठे, विजय सुतार, माजी नगरसेविका विजयाताई सुतार यांच्यासह प्रसाद कांबळे, राजन नायर, संजिवनी जगताप, रोहित मुणगेकर, मिलिंद कांबळे, आदींसह शेकडो कार्यकर्त्यांनी भाजपाला रामराम ठोकत राष्ट्रवादीसोबत विकास वाटेवर चालण्याचा निर्धार करत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर माजी मंत्री शशिकांत शिंदे, माजी मंत्री राजेश टोपे, माजी आमदार विलास लांडे, अतुल लोंढे, आमदार व निरीक्षक सुनील शेळके, चिंचवड विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार विठ्ठल उर्फ नाना काटे, त्यांच्या पत्नी तथा माजी नगरसेविका शीतल काटे, राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अजित गव्हाणे, युवक अध्यक्ष इम्रान शेख, महिलाध्यक्ष कविता आल्हाट, पुण्याचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप, कांग्रेसचे शहराध्यक्ष कैलास कदम, शिवसेनेचे शहराध्यक्ष सचिन भोसले, रविकांत वर्पे, पुणे जिल्हा नियोजन समिती सदस्य निवृत्तीआण्णा बांदल, माजी महापौर संजोग वाघेरे, माजी नगरसेवक गोरक्ष लोखंडे, बाबुराव चांदेरे, गणेश खांडगे, प्रशांत शितोळे, आरपीआयचे (खरात गट) सचिन खरात, जगदीश शेट्टी, सुलक्षणा शिलवंत, फझल शेख, संतोष कोकणे, विनोद नढे, निलेश पांढारकर, धनंजय भालेकर, सुजाता नांदगुडे, लताताई ओव्हाळ, सायली नढे, शाम जगताप, तानाजी जवळकर यांच्यासह महाविकास आघाडीतील विविध पक्षांचे पदाधिकारी, आजी माजी नगरसेवक उपस्थित होते.

यावेळी बोलताना अजित पवार यांनी भाजपच्या कारभाराचा अक्षरश: पंचनामा केला. महापुरुषांचा अपमान, राज्याबाहेर गेलेले मोठे प्रकल्प, वाढती बेरोजगारी, महागाई, राज्यात सरकार असंविधानिक पद्धतीने आलेले सरकार, तोडफोडीचं आणि खोक्यांचे राजकारण, लोकांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष यासह जनतेच्या विविध मूलभूत प्रश्नांना हात घालत अजितदादांनी राज्य सरकारवर खरमरीत टीका केली.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही कारभार करत असताना अडचणी आमच्याही पुढे होत्या. करोना काळात आम्ही आमची जबाबदारी चोख पार पाडली. पिंपरी – चिंचवड शहराच्या विकासासाठी केलेल्या कामांची जंत्रीच पवारांनी यावेळी सादर केली. शरद पवारांच्या दूरदृष्टीने या शहरात आयटी पार्क उभे राहिले. त्यातूनच शहराच्या विकासाची पायाभरणी झाली. आज पिंपरी चिंचवड जागतिक नकाशावर आहे त्याचे कारण त्यामागे राष्ट्रवादीने केलेल्या विकासकामांमध्ये दडले आहे.

गद्दार कोण?
ज्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी पदे दिली. सन्मान दिला, घरात जागा दिली, त्यांनी त्याच घरात चोरी केली आणि जाताना घराची पाटीही पळवून नेली. शिवसैनिकांनी रक्त ओकून वाढवलेली संघटना भाजपाच्या दावणीला कोणी बांधली. निवडणूक आयोगाचा कालचा निकाल काय सांगतो? याचा विचार करण्याची वेळ आली आहे. या निर्णयाला उध्दव ठाकरे सर्वोच्च न्यायालयात आव्हान निश्चित देतील, असा विश्वास व्यक्त करतानाच 50 खोके, एकदम ओके सगळ्यांनाच पटलं, अशी टीकाही त्यांनी यावेळी केली.
ज्या महापुरुषांची नावे घेऊन तुम्ही राजकारण करता त्या महापुरुषांनी तुम्हाला हेच शिकवलं का? स्वार्थासाठी किती टोकाची भूमिका घेणार? महाराष्ट्र तुम्हाला कधीही माफ करणार नाही. जनतेला न रुचणारा निर्णय घेतला तर जनताच त्याला उत्तर देते, असा टोलाही त्यांनी लगावला. राजकारण इतकी वर्षे करणाऱ्या भाजपला स्वतःचे कार्यकर्तेही तयार करता आले नाहीत. आमचेच कार्यकर्ते फोडून नेले. ज्यांना स्वत:चे कार्यकर्ते उभे करता आले नाहीत, ते राज्याचा विकास काय करणार? असा प्रश्नही त्यांनी यावेळी उपस्थित केला.
अंगात पाणी नसणारे जनतेला पाणी कुठून देणार?
शहरात पाण्याचा प्रश्न गहन आहे. शहर वेगाने वाढत आहे. पवनेच पाणी आणायचे ठरवले, त्यात खूप अडचणी आल्या. माझी भूमिका स्पष्ट आणि स्वच्छ होती. सर्वांनाच पाणी मिळायला हवे. त्यात आम्ही कधी राजकारण आणले नाही. भाजपने पाच वर्षात नुसत्या घोषणा केल्या. भामा आसखेड, अंद्रा धरणाचे पाणी आणू, पण पाणी काही शहरवासीयांना मिळाले नाही. या उलट जॅकवेलचा घोटाळा तेवढा झाला. पाणी कुठेयं? अंगातच पाणी नसणारे जनतेला कुठून पाणी देणार? असा प्रहारही पवार यांनी केला.