पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन…


पिंपरी, ऑनलाईन परिवर्तनाचा सामना- दि. २५ सप्टेंबर २०२३- पिंपरी चिंचवड महापालिकेच्या वतीने प्रत्येक महिन्याच्या दुसऱ्या आणि चौथ्या सोमवारी जनसंवाद सभेचे आयोजन आयुक्त तथा प्रशासक शेखर सिंह यांच्या आदेशानुसार सर्व क्षेत्रिय कार्यालयांत करण्यात येते. सभेचे अध्यक्ष तथा मुख्य समन्वयक म्हणून नेमणूक करण्यात आलेल्या अधिकाऱ्यांनी त्यांना नेमून दिलेल्या मनपा क्षेत्रीय कार्यालयात उपस्थित राहून नागरिकांना महापालिकेच्या अनुषंगाने असलेली कामे, अडचणी, तक्रारी, सूचना या सर्व बाबींची नोंद घेऊन संबधितांना या बाबतीत कार्यवाही करण्याच्या सूचना महापालिकेकडून दिल्या गेल्या आहेत.
महापालिकेच्या क्षेत्रिय कार्यालयांमध्ये आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी सहभाग घेऊन एकूण ३५ तक्रारवजा सूचना मांडल्या. यात अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह क्षेत्रीय कार्यालयांमध्ये अनुक्रमे १०, ४, ५, १, ४, ३, २ आणि ६ तक्रारी वजा सूचना नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
अ, ब, क, ड, इ, फ, ग आणि ह या क्षेत्रीय कार्यालयांच्या जनसंवाद सभेचे अध्यक्षपद मुख्य समन्वय अधिकारी असलेले अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप, सह आयुक्त चंद्रकांत इंदलकर, सहशहर अभियंता श्रीकांत सवणे, मनोज सेठीया, संजय कुलकर्णी, प्रमोद ओंभासे, अजय चारठाणकर यांनी भूषवले. तसेच यावेळी क्षेत्रीय अधिकारी सुचिता पानसरे, अमित पंडित, आण्णा बोदडे, किरण मोरे, राजेश आगळे, सिताराम बहुरे, शितल वाकडे, उमेश ढाकणे उपस्थित होते.
आज पार पडलेल्या जनसंवाद सभेत नागरिकांनी विविध तक्रारी व सूचना मांडल्या. यामध्ये मुख्यत्वे नुकत्याच झालेल्या पावसाचे पाणी रस्त्यावर साचले होते, भविष्यात अशी समस्या पुन्हा उद्भवू नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात यावी आणि अनंत चतुर्दशीच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर होणाऱ्या श्रीगणेश विसर्जनासाठी विसर्जन मार्गावरील रस्त्यावरील अडथळे तसेच अतिक्रमणे दूर करावीत अशा सूचनांचा प्रामुख्याने समावेश होता.
तसेच रस्ते आणि ड्रेनेज लाईन्स दुरूस्त कराव्यात, पाणीपुरवठा योग्य दाबाने करावा, शहरात वाढणाऱ्या रहदारीचे योग्य नियोजन करावे या सूचनाही नागरिकांनी उपस्थित राहून मांडल्या.
नागरिकांशी सुसंवाद साधणे, तक्रारींचे निराकरण करणे आणि प्रशासकीय निर्णयांमध्ये तसेच होणाऱ्या विकासकामांमध्ये नागरिकांच्या समस्यां दूर व्हाव्यात यासाठी क्षेत्रिय कार्यालयनिहाय जनसंवाद सभेचे आयोजन करण्यात येत असते. या सभेकरीता महानगरपालिकेच्या आठ क्षेत्रीय कार्यालयांसाठी क्षेत्रीय कार्यालय निहाय मुख्य समन्वय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या केल्या आहेत.