तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या विकासाचा आणि नवभारताच्या संकल्पनेचा उल्लेख- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

fad

मुंबई |  (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, आज मला येथे दोन सागर दिसत आहेत. एक म्हणजे समोर असलेला हिंद महासागर आणि दुसरा म्हणजे भारतीय तिरंग्याचा महासागर. ज्या तिरंग्यासाठी क्रांतिकारकांनी बलिदान दिले, सैनिकांनी सीमेवर प्राणांची आहुती दिली आणि देशवासीयांनी स्वातंत्र्यासाठी संघर्ष केला, तो तिरंगा जोपर्यंत चंद्र-सूर्य आहेत तोपर्यंत सदैव उंच फडकत राहील. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत जगातील चौथी सर्वात मोठी आर्थिक महासत्ता बनला आहे. विविध क्षेत्रांमध्ये भारताने उल्लेखनीय प्रगती केली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यान उतरविणारा भारत हा जगातील पहिला देश ठरला आहे. अंतराळ संशोधन, माहिती तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, फिनटेक आणि उदयोन्मुख तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भारताने मोठी झेप घेतली आहे,असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.भारतामध्ये जगातील दुसरी सर्वात मोठी स्टार्टअप इकोसिस्टम विकसित होत असल्याचे सांगून मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले., भारताकडे सर्वात मोठी युवा शक्ती आहे. तिरंगा हातात घेऊन बाहेर पडणाऱ्या या तरुणाईला थांबवण्याची ताकद जगात कोणाकडेही नाही. भारत एक मोठी महासत्ता म्हणून उदयास येत आहे.

भारताची प्रगती काही शक्तींना खटकत आहे. काही परकीय शक्ती भारताची घोडदौड थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र भारताचा विकासाचा प्रवास कोणीही थांबवू शकणार नाही. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पाहिलेल्या नवभारताच्या संकल्पनेतून आगामी काळात भारत विकसित राष्ट्र म्हणून जगाच्या नकाशावर अग्रस्थानी दिसेल,असा विश्वास मुख्यमंत्री फडणवीस यांनी व्यक्त केला.

भारतीय तिरंगा आज आपण हातात घेतला असला तरी तो आपल्या मनामध्ये आहे. भारतीय संविधानाचा सन्मान, देशाचा स्वाभिमान आणि राष्ट्रभावना आपल्या अंतःकरणात आहे. नवभारत घडविण्याची जबाबदारी आता प्रत्येक नागरिकाची आहे. ही जबाबदारी आपण पार पाडली तरच हातातील तिरंग्याला खऱ्या अर्थाने अर्थ प्राप्त होईल, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले. तिरंगा यात्रा ही केवळ एक रॅली नसून देशप्रेमाची भावना जागृत करणारा उपक्रम असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. वरळी सी फेस येथे आयोजित करण्यात आलेल्या ‘राष्ट्र प्रथम तिरंगा उत्सव’ रॅलीचे उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांनी तिरंग्याचे महत्त्व अधोरेखित करत देशाच्या विकासाचा आणि नवभारताच्या संकल्पनेचा उल्लेख केला.

या रॅलीसाठी वरळी सी फेस येथे हजारो मुंबईकर एकत्र आले होते. तिरंगा ध्वज हातात घेतलेले नागरिक, युवक, विद्यार्थी आणि एनसीसी कॅडेट्स यांच्या उत्साहामुळे संपूर्ण परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला होता. ‘भारत माता की जय’, ‘जय शिवाजी, जय भवानी’, ‘वंदे मातरम्’ अशा घोषणांसह देशभक्तीपर गीतांनी वातावरण दुमदुमून गेले.

यावेळी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड. आशिष शेलार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, मुंबईच्या महापौर रितू तावडे, सर्वश्री आमदार रवींद्र चव्हाण, अमित साटम, योगेश सागर, मिहिर कोटेचा, कॅप्टन तमिळ सेल्वन, राजहंस सिंह, प्रवीण दरेकर, प्रसाद लाड आदी उपस्थित होते.

Latest News