मोदी सरकारने आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईतून गुजरातला हलवले

मुंबई – महाराष्ट्राची राजधानी मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी मानली जाते. देशातील बहुतांश आर्थिक व्यवहार हे मुंबईतून होत असतात. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये मुंबईला अनन्यसाधारण महत्त्व आहे. मात्र मुंबईचे हे महत्त्व कमी करणारे निर्णय सातत्याने होत असतात. दरम्यान, काल राज्यात महाराष्ट्र दिन साजरा होत असतानाच केंद्र सरकारने महाराष्ट्राला धक्का देणारा एक मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईत नियोजित असलेले आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र (IFSC) गुजरातला हलवण्यात आले आहे. ऐन महाराष्ट्र दिनादिवशीच हा निर्णय घेण्यात आल्याने महाराष्ट्रातून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यासंदर्भातील वृत्त मुंबई मिरर या इंग्रजी वर्तमान पत्रात प्रकाशित झाले होते. केंद्र सरकारने यासंदर्भाती अधिसूचना २७ एप्रिल रोजी प्रसिद्ध केलेल्या गॅझेटमध्ये प्रसिद्ध केली आहे. त्यानुसार मुंबईत नियोजित असणारे हे आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र आता गुजरातमध्ये गांधीनगर येथे होईल . पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वाकांक्षी असलेला गुजरात इंटरनॅशनल फायनान्स सिटी हा प्रकल्पसुद्धा गांधीनगर येथेच आकारास येत आहे. दरम्यान, आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र मुंबईहून गांधीनगरला गेल्याने महाराष्ट्राला सुमारे दोन लाख नोकऱ्यांवर पाणी सोडावे लागणार आहे, असा अंदाज तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे.

Latest News