तामिळ: दलित महिलेला खाली जमिनीवर बसवल्याचं उघड अजुनही अस्पृश्यता पाळली जाते ही अतिशय लज्जास्पद आणि बुरसटलेल्या मानसिकतेचं प्रतिक

चेन्नई: जग 21व्या शतकात असल्याच्या चर्चा झडत असताना तामिळनाडूतल्या कुड्डलोर मधली एक लज्जास्पद घटना समोर आली आहे. ही घटना समोर आल्यानंतर संवेदना जागे असणाऱ्या कुणाही माणसाचं मन सुन्न झाल्याशिवाय राहणार नाही. इथल्या पंचायत अध्यक्षांच्या बैठकीत एका दलित महिलेला  खाली जमिनीवर बसवल्याचं उघड झालं आहे. कुड्डलोर इथल्या पंचायत ऑफिसमध्ये अध्यक्षांनी एका बैठकीचं आयोजन केलं होतं. त्या बैठकीत सगळ्यांना बसायला खुर्च्यांची व्यवस्था केली होती. एका दलित महिलेला मात्र खाली जमिनीवर बसवलं गेलं. या बैठकीचा व्हिडीओ सोशल मीडियावर  व्हायरल झाल्यानंतर त्यावर चौफेर टीकेची झोड उठली आहे. पोलिसांनी त्याची दखल घेत पंचायतीच्या अध्यक्षांविरुद्ध SC/ST कायद्यानुसार गुन्हा नोंदवला आहे. या बैठकीत अनेक खुर्च्या रिकाम्या होत्या मात्र त्यावर त्या महिलेला जागा देण्यात आली नाही. जग एवढं पुढारलेलं म्हणत असताना अजुनही समाजाची मानसिकता बदललेली नाही. अजुनही अस्पृश्यता पाळली जाते ही अतिशय लज्जास्पद आणि बुरसटलेल्या मानसिकतेचं प्रतिक आहे अशा प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर व्यक्त होत आहेत.

देशात दलित अत्याच्याराच्या घटनांही वारंवार घडत असतात. त्यानंतर त्यावर चर्चा होते परिस्थितीत मात्र काही फरक पडत नाही असं मत सामाजिक कार्यकर्त्यांनी व्यक्त केलं आहे.  सरकार विविध योजनांवर कोट्यवधी रुपये खर्च करते. जाहीराती होतात, शाळांमधून शिकवलंही जातं मात्र जो परिणाम दिसायला पाहिजे तो परिणाम काही दिसत नाही असं मतही व्यक्त केलं जात आहे.

तामिळनाडूतल्या या घटनेनंतर आता सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरू झाली आहे. मात्र जोपर्यंत समाजाती मानसिकता बदलत नाही तोपर्यंत नुसतल्या चर्चांनी काहीही फायदा होणार नाही. समाजातल्या जाणत्या लोकांनी अशा गोष्टी आपल्या आचरणातून दाखवून द्यायला पाहिजे असं मतही ज्येष्ठ विचारवंतांनी व्यक्त केलं आहे.

Latest News