ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील…


जळगाव | केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांनी दिल्लीमध्ये आंदोलन केलं आहे. गेल्या 10 दिवसापासून हे आंदोलन सुरू आहे. देशभरातून शेतकरी या आंदोलनाला पाठींबा देत आहेत. याच पार्श्वभूमीवर शिवसेना नेते गुलाबराव पाटलांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. शेतकऱ्यांवर अन्याय करू नका. अन्यथा दिल्ली दूर नाही. तुमचे तीनच वर्षे उरले आहेत. ज्या तख्तावर तुम्ही बसले आहात, ते तख्त शेतकरी बदलून टाकतील, असं गुलाबराव पाटलांनी म्हटलं आहे. शेतकरी या देशाचा कणा आहे. जर शेतकरी जगला तरच हा देश जगेल. भारत देश केवळ कृषीप्रधान आहे असं म्हणून चालणार नाही तर त्यासाठी शेतकरी हिताचे निर्णय घ्यावे लागतील, असंही पाटलांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्रातून मंत्री बच्चू कडू आपल्या कार्यकर्त्यांसह रवाना झाले आहेत. तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेत्या पूजा मोरे दिल्लीमध्ये आंदोलनाच्या ठिकाणी पोहचल्या आहेत.