रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं, शरद पवार थेट साताऱ्यात


सातारा: आशिया खंडातील सर्वात मोठ्या रयत शिक्षण संस्थेचे माजी सचिव कऱ्हाळे यांनी पुण्यात राजीनामा दिल्यानं राजकीयसह शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार थेट आज साताऱ्यात दाखल झाले आहेत. शरद पवार साताऱ्यात डॅमेज कंट्रोल करण्यासाठी साताऱ्यात पोहोचल्याचं बोललं जात आहे.
शरद पवार यांच्या नेतृत्त्वात आज साताऱ्यात रयत शिक्षण संस्थेची महत्त्वाची बैठक पार पडत आहे. या बैठकीला रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन अनिल पाटील आणि रयतचे पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
पुण्यातील रयत शिक्षण संस्थेत तीन वर्षे कार्यरत असलेले माजी सचिव कऱ्हाळे यांनी राजीनामा दिल्यानंतर शैक्षणिक क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे. त्यामुळे साताऱ्यात होणाऱ्या या बैठकीकडे संस्थापातळीवर सर्वांचे लक्ष लागले आहे. या बैठकीत शरद पवार आणि रयतचे पदाधिकारी यांच्यात काय चर्चा होणार, त्याचबरोबर शरद पवार काय निर्णय घेणार याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
दुसरीकडे, कृषी कायद्याबाबतच्या बैठकीवर राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मोठं विधान केलं आहे .काही म्हणतील कृषी बिल संपूर्ण रद्द करा. पण सगळ्यांशी चर्चा करू. एका बैठकीतून हा प्रश्न सुटणार नाही, असं परखड मत अजित पवार यांनी व्यक्त केलं आहे.
कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. महाविकास आघाडी सरकारनं सुद्धा शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.
अजित पवार म्हणाले, कृषी कायद्याबाबत आज बैठक होणार आहे. आता आपल्या देशातील शेतकरी आंदोलन करत आहे. सुप्रीम कोर्टाने पण केंद्राला सांगितलं चर्चा करा, ते आंदोलन चिघळलं आहे. शेतकरी म्हणतात आमची भूमिका मान्य करा, काही प्रमाणात काही निर्णय घेतले जातील. महाविकास आघाडी सरकार आहे या बिल विरोधात आंदोलनाला तिन्ही पक्षाने समर्थन दिलं आहे.