सरकारी भरतीचा बट्ट्याबोळ, राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही!

मुंबई: आरोग्य भरती परीक्षेचा घोळ, पेपर फुटीचे धागेदोरे आरोग्य संचालनालयापर्यंत. आता म्हाडाच्या परीक्षेतही तसाच घोळ, मध्यरात्री परीक्षा रद्द करण्याची वेळ. सरकारी भरतीचा हा बट्ट्याबोळ आणि राज्य सरकार काहीच बोलायला तयार नाही! भ्रष्टाचार, अनास्था आणि निर्लज्जतेचा कळस”, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले

“किती दिवस आणि किती वेळा हे सहन करायचे? राज्यात सरकार नावाची यंत्रणा कार्यान्वित होणार आहे की नाही? आज पुन्हा लाखो विद्यार्थ्यांना फटका बसलाय ! नोकरी देऊ शकत नसाल तर किमान त्यांची अशी थट्टा तर करु नका. दोषींवर कठोर कारवाई कराच, पण सरकार म्हणून कुणी याची जबाबदारी घेणार की नाही?”, असे सवाल फडणवीसांनी केले.

.

सरकारी परीक्षेसाठी चाचपडणाऱ्या महाराष्ट्रातील लाखो मुलांनी आरोग्य विभाग आणि म्हाडाच्या परीक्षेसाठी अर्ज दाखल केला होता. पण परीक्षा घेणाऱ्या यंत्रणेला भ्रष्टाचाराने पोखरल्याने ऐनवेळी या परीक्षा रद्द करण्याची नामुष्की सरकारवर ओढवली. विशेष म्हणजे म्हाडाची परीक्षा ही मध्यरात्री रद्द करण्यात आल्याने राज्यभरातील लाखो विद्यार्थ्यांना त्याचा फटका बसला. या परीक्षेसाठी शेकडो चेहऱ्यांपाठीमागे असणाऱ्या त्यांच्या कुटुंबांचीदेखील मोठी आशा होती. पण ऐनवेळी परीक्षा रद्द झाली आणि विद्यार्थ्यांसह त्यांच्या कुटुंबांना मनस्तापाला सामोरं जावं लागलं. याच गोष्टीवरुन भाजप नेते आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी ट्विटरवर संताप व्यक्त केला आहे.

म्हाडा पेपर फुटीप्रकरणी पुणे सायबर पोलिसांनी आतापर्यंत पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. अटक करण्यात आलेल्यांपैकी दोन एजंट बुलढाण्याचे (Buldhana) तर एक जण परीक्षा घेणारा संस्थेतील पुण्यातील (Pune) आरोपी असल्याचं समोर आलं आहे. दरम्यान पुणे सायबर पोलिसांची कार्यवाही केली असून मोठे मासे गळाला लागले आहेत. जी. ए. सॉफ्टवेअरचा संचालक प्रितीश देशमुख, एजंट संतोष हरकळ आणि एजंट अंकुश हरकळ अशी आरोपींची नावं आहेत. हे आरोपी म्हाडा परीक्षेचा पेपर फोडायच्या तयारीत होते. मात्र विश्रांतवाडीतून रात्री दहा वाजता त्यांना ताब्यात घेतलं.

जी ए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षा आयोजनाचं कंत्राट होतं. तिघेही आरोपी रात्री पेपर फोडण्याच्या तयारीनं एकत्रित आले असताना पुणे सायबर पोलिसांनी त्यांना रंगेहाथ पकडलं. पुणे सायबर पोलिसांच्या या कारवाईमुळे म्हाडाची परीक्षा ऐनवेळी रद्द करावी लागली.

पेपरफुटीचं बिंग कसं फुटलं?

जी.ए. सॉफ्टवेअर कंपनीचा डायरेक्टर रितेश देशमुख आणि दोन एजंट हे रात्री विश्रांतवाडी परिसरामध्ये पेपर देण्यासाठी आले होते. तेव्हाच पुणे सायबर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं आणि अटक केली. हा पेपर रात्रीतून रद्द करण्यात आला सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा पेपर मोठ्या रकमेला विकला जाणार होता. हा पेपर होण्याआधीच पोलिसांच्या जाळ्यात मुख्य सूत्रधार अडकला याच्यामागे कोण मोठे सूत्रधार आहेत. याचाही तपास पोलिसांनी सुरु केला आहे.हा पेपर कशा पद्धतीने फुटला जाणार होता कशा पद्धतीने पुणे पोलिसांनी अटक केली. यापूर्वीही पुणे पोलिसांनी आरोग्य भरतीतील अनेक मोठे अधिकाऱ्यांना अटक केली आहे. त्याचबरोबर लष्कर भरतीचाही पर्दाफाश पुणे पोलिसांनी केलाय . यामागे क्लास चालवणारे मोठ्या प्रमाणावर असतात असा संशय पुणे पोलिसांना होता आणि त्याच आधारे महाडा पेपरफुटीचे बिंग फुटले गेले .

Latest News