पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा पडतोय अस्ताव्यस्त;  नागरिक हैराण:माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी 

पिंपळे गुरवमध्ये रस्त्याच्या कडेला कचरा पडतोय अस्ताव्यस्त;  नागरिक हैराण

वेळेवर कचरा उचला किंवा कचराकुंड्या ठेवा

माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांची मागणी 
पिंपळे गुरव, वार्ताहर :
शहर कचराकुंडीमुक्त करत असताना नियोजनाच्या अभावामुळे रस्त्याच्या कडेला जागोजागी कचऱ्याचे ढीग साठत आहेत. परिणामी हा कचरा अस्ताव्यस्त होऊन रस्त्यावर येत आहे. त्यामुळे महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंड्या ठेवण्याची व्यवस्था करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांनी महापालिका प्रशासनाकडे केली आहे.
       राजेंद्र जगताप यांनी सांगितले, की कचराकुंडीमुक्त शहर ही संकल्पना स्तुत्य आहे. पण त्या दृष्टीने महापालिका प्रशासनाने नियोजन करणे आवश्यक आहे. नियोजन न करताच सर्व ठिकाणच्या कचराकुंड्या हटवण्यात आल्या आहेत. नोकरदार, कंपन्यांमध्ये काम करणारे नागरिक यांना घंटागाडी येण्याच्या वेळी घरी थांबता येत नाही. त्यामुळे कचरा  रस्त्या टाकायचा हा प्रश्न त्यांना पडलेला आहे. मग हे नागरिक रस्त्याच्या कडेला मोकळी जागा दिसेल तिथे कचरा टाकताना दिसतात. हाच कचरा मोकाट जनावरे, कुत्री यांच्यामुळे अस्ताव्यस्त होऊन रस्त्यावर येताना दिसतो. परिणामी नागरिकांना दुर्गंधीचा त्रास होऊन आरोग्याच्या समस्या निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. हे लक्षात घेऊन महापालिकेने ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवून त्यातील कचरा सकाळ संध्याकाळ उचलण्याची व्यवस्था करणे आवश्यक आहे. जेणेकरून हा कचरा रस्त्यावर येणार नाही, तसेच नागरिकांना दुर्गंधीचा सामना करावा लागणार नाही. 
           पिंपरी-चिंचवड शहर स्मार्ट सिटी करण्यासाठी स्वच्छतेच्या दृष्टीने महापालिकेने कचराकुंडीमुक्त शहर करण्याच्या दृष्टीने पावले उचलायला सुरुवात केली आहे. महापालिकेचा हा उपक्रम स्तुत्य आहे. कुठेही अस्ताव्यस्त टाकण्यात आलेल्या कचर्‍यामुळे साथीचे आजार, डास, दुर्गंधी याचा मोठा त्रास नागरीकांना सहन करावा लागत होता. आता कचराकुंड्या उचलल्याने कचरा कुठेही अस्ताव्यस्त पडणार नाही, अशी महापालिकेची अपेक्षा होती. मात्र, आयटी कंपन्यांमध्ये काम करणारे, नोकरदार यांना महापालिकेच्या घंटागाडीची वेळ गाठता येत नाही. त्यामुळे असे नागरीक सकाळी कामाला जाताना किंवा कामावरून आल्यानंतर कचरा टाकण्यासाठी घराबाहेर पडतात. पण कचराकुंडीच नसल्याने त्यांना रस्त्याच्या कडेला कचरा टाकण्याशिवाय पर्याय राहिलेला नाही. त्यामुळे ठराविक ठिकाणी कचराकुंड्या ठेवून त्या दोन वेळा उचलण्याची उचलण्यात याव्यात, असेही राजेंद्र जगताप यांनी सांगितले. 


 महापालिका प्रशासनाने कचरा समस्येकडे गांभीर्याने लक्ष द्यावे. महापालिकेने किमान ठराविक ठिकाणी कचराकुंडी ठेवावी. जेणेकरून कामावर जाताना किंवा कामावरून आल्यानंतर या लोकांना कचरा टाकण्याची सोय होईल. या कचरा कुंड्यातील कचरा उचलण्यासाठी दिवसातून दोन वेळा कॉम्पॅक्टर आल्यास कचराकुंड्यातील कचरा अस्ताव्यस्त होणार नाही.
                     – राजेंद्र जगताप, माजी नगरसेवक, राष्ट्रवादी काँग्रेस

Latest News