महापालिकेची सॉफ्टवेअर प्रणाली आठ दिवसांपासून ठप्प; दोषींवर कठोर कारवाईची मागणी – नगरसेवक संदीप वाघेरे यांचे आयुक्तांना निवेदन

पिंपरी प्रतिनिधी
(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना):
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेची मुख्य सॉफ्टवेअर प्रणाली गेल्या आठ दिवसांपासून पूर्णपणे बंद असल्याने नागरिकांच्या दैनंदिन कामकाजासह महापालिकेचे प्रशासकीय व्यवहार आणि महसूल संकलन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत नगरसेवक संदीप वाघेरे यांनी महानगरपालिका आयुक्तांना ई-मेलद्वारे सविस्तर निवेदन पाठवून तात्काळ हस्तक्षेप करण्याची आणि संबंधित दोषी अधिकारी व कंत्राटदारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
निवेदनात नमूद केल्याप्रमाणे, सॉफ्टवेअर प्रणालीच्या देखभालीची जबाबदारी असलेल्या कंत्राटदार कंपनी तसेच संबंधित आयटी विभागाकडून या तांत्रिक बिघाडाकडे गंभीर दुर्लक्ष करण्यात आले आहे. परिणामी जन्म-मृत्यू दाखले, विवाह नोंदणी
प्रमाणपत्रे, मालमत्ता कर व पाणीपट्टी भरणे, विविध परवान्यांशी संबंधित सेवा आणि इतर अनेक ऑनलाइन सुविधा पूर्णपणे ठप्प झाल्या असून नागरिकांना आठ दिवसांपासून हेलपाटे मारावे लागत आहेत.
याशिवाय महापालिकेच्या अंतर्गत फाईल्सची देवाणघेवाण, ई-गव्हर्नन्स प्रणाली आणि दैनंदिन कार्यालयीन कामकाजावरही मोठा परिणाम झाला असून अनेक विकासकामांचे निर्णय व अंमलबजावणी रखडल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. ऑनलाइन कर संकलन बंद असल्यामुळे महापालिकेच्या महसूलावरही मोठा परिणाम होत असून कोट्यवधी रुपयांचे आर्थिक नुकसान होत असल्याचा दावा करण्यात आला आहे.
नगरसेवक संदीप वाघेरे यांनी आयुक्तांकडे खालील प्रमुख मागण्या केल्या आहेत:
• बंद पडलेली सॉफ्टवेअर प्रणाली युद्धपातळीवर तात्काळ पूर्ववत सुरू करण्यात यावी.
• करारातील अटींचा भंग करणाऱ्या संबंधित कंत्राटदार कंपनीवर दंडात्मक कारवाई करून आवश्यक असल्यास काळ्या यादीत समाविष्ट करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात यावी.
• कामावर योग्य देखरेख न ठेवणाऱ्या व कर्तव्यात कसूर करणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कठोर प्रशासकीय कारवाई करण्यात यावी.
“नागरिकांना मूलभूत सेवा देण्यात सातत्य राहणे ही महापालिकेची प्राथमिक जबाबदारी आहे. आठ दिवसांपासून संपूर्ण प्रणाली बंद राहणे ही अत्यंत गंभीर बाब असून यासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे,” असे नगरसेवक संदीप वाघेरे यांनी निवेदनाद्वारे स्पष्ट केले आहे.
या गंभीर प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून महानगरपालिका प्रशासनाने याप्रकरणी तातडीने उपाययोजना करून सेवा पूर्ववत सुरू कराव्यात, अशी मागणी नागरिकांमधूनही होत आहे.
