केंद्र व राज्यातून भाजप सरकारला सत्तेतून घालविण्याचा काँग्रेसचा निर्धार…..सचिन साठे

पिंपरी (दि. 23 जानेवारी 2019) उद्योग, व्यवसाय निर्मिती मध्ये मोदी आणि फडणवीस सरकार पुर्णत: अपयशी ठरले आहे. हे अपयश झाकण्यासाठी तरुण पिढीला जातीयवाद आणि मंदिर, मस्जिद अशा वादात अडकवूण त्यांचे भवितव्य अंधकारमय करण्याचे काम भाजपा करीत आहे. भावी पिढीचे भविष्य सुरक्षित ठेवण्यासाठी केंद्र व राज्यातून भाजप सरकारला सत्तेतून घालविण्याचा निर्धार सुज्ञ मतदारांनी केला आहे असे मत पिंपरी चिंचवड शहर जिल्हा कॉंग्रेस पार्टीचे शहराध्यक्ष सचिन साठे यांनी व्यक्त केले.


पिंपरी चिंचवड युवक काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. 22 जानेवारी) चिंचवड विधानसभा युवक काँग्रेसने “वॉर्ड संपर्क अभियान 2019” प्रभाग क्रमांक 22 ची बैठक काळेवाडी येथे आयोजित केली होती. चिंचवड विधानसभा युवक काँग्रेस अध्यक्ष संदेश बोर्डे यांनी आयोजित केलेल्या या बैठकीस माजी महापौर कवीचंद भाट, अल्पसंख्यांक सेलचे प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्रसिंह वालिया, महिला कमिटीच्या सचिव बिंदू तिवारी, शहर सरचिटणीस सज्जी वर्की, सेवादलाचे शहराध्यक्ष मकरध्वज यादव, चिंचवड ब्लॉक अध्यक्ष परशुराम गुंजाळ, ओबीसी सेलचे शहराध्यक्ष किशोर कळसकर, युवा अध्यक्ष नरेंद्र बनसोडे, ज्येष्ठ नागरीक सेलचे शहराध्यक्ष लक्ष्मण रूपनर, सचिन कोंढरे, नीलेश घागरे, करण सिंग, हिरा जाधव, वसिम शेख, चंद्रशेखर जाधव, शैलेश अनंतराव, जीफ्फीन जॉन्सन, सीमा पाटील, स्मृती अडागळे, तुषार पाटील, स्नेहल गायकवाड आदींसह युवक कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.


साठे म्हणाले की, ‘विकासाचे मॉडेल’ दाखवून पंतप्रधान नरेंद्र मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मते मिळविली. दरवर्षी दोन कोटी रोजगार देऊ या आश्वासनाला तरुण बेरोजगार बळी पडले. हुकूमशाही पध्दतीने लादलेल्या नोटाबंदी मुळे लाखों तरुण बेरोजगार झाले. ‘फसणवीस’ सरकारने प्रत्यक्षात मागील चार वर्षात कामगार कपात केली. आता निवडणूकीच्या तोंडावर पस्तीस हजार जागांसाठी कामगार भरतीचे फसवे आश्वासन मुख्यमंत्री फडणवीस देत आहेत. त्यांच्या भुलथापांना तरुण आता बळी पडणार नाहीत. या सरकारचे अपयश मतदारांपर्यंत पोहचविण्यासाठी युवक कॉंग्रेसने राज्यस्तरावर वॉर्ड संपर्क अभियान सुरु केले आहे असे साठे यांनी सांगितले.
स्वागत संदेश बोर्डे, सुत्रसंचालन शैलेश अनंतराव आणि आभार चंद्रशेखर जाधव यांनी मानले.

Latest News