अर्थव्यवस्थेला बळ देण्यासाठी 11 तज्ज्ञांचिं- ठाकरे सरकार समिती स्थापन करणार


मुंबई: कोरोनामुळे ठप्प झालेल्या राज्याच्या अर्थव्यवस्थेचं पुनरुज्जीवन करण्यासंदर्भात प्रभावी उपाययोजना सुचवण्यासाठी अकरा तज्ज्ञ सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती ३० एप्रिलपर्यंत आपला अहवाल सादर करणार आहे. वित्तविभागाने यांसदर्भातील शासननिर्णय काल जारी केला, अशी माहिती अर्थमंत्री अजित पवार यांनी आज दिली. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी २४ मार्चपासून राज्यात लॉकडाउन जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे उद्योग, व्यापार, सेवाक्षेत्र ठप्प झाले आहे. त्याचा परिणाम राज्याच्या उत्पन्नावर आणि पर्यायाने विकासकामांवर होत असल्याने अर्थव्यवस्था लवकरात लवकर पूर्वस्थितीत आणण्याची आवश्यकता आहे. यासंदर्भात उपाययोजना सूचवण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला होता. त्यानुसार ही समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत जे. एस. सहानी (सेवानिवृत्त आयएएस), सुबोधकुमार (सेवानिवृत्त आयएएस), रमानाथ झा (सेवानिवृत्त आयएएस), उमेशचंद्र सरंगी (सेवानिवृत्त आयएएस), जयंत कावळे (सेवानिवृत्त आयएएस), सुधीर श्रीवास्तव (सेवानिवृत्त आयएएस), नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव, उद्योग विभागाचे प्रधान सचिव, वित्तीय सुधारणा विभागाचे प्रधान सचिव आणि कृषी विभागाच्या सचिवांचा समावेश आहे. वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव हे या समितीचे समन्वयक म्हणून काम पाहणार आहेत. करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर राज्याची अर्थव्यवस्था पुनरुज्जीवित करणे आणि राज्याला पुन्हा आर्थिक सुस्थितीत आणण्याच्या दृष्टीने ही समिती उपाययोजना सुचवेल, असे अजित पवार यांनी म्हटले आहे.