‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत – मनसे नेते संदीप देशपांडे


मुंबई : ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत, असा आरोप मनसे नेते संदीप देशपांडे यांनी केला आहे. ‘मुख्यमंत्र्यांना जर जबाबदारी पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये’, असादेखील घणाघात संदीप देशपांडे यांनी केला ‘पत्रकार पांडुरंग रायकर यांच्या मृत्यूला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. त्यांच्या निष्काळजीपणामुळेच हा मृत्यू झाला. तुम्ही यंत्रणा नीट चालवत नाहीत. यंत्रणा नीट चालते की नाही, याची माहिती घेण्याचं काम मुख्यमंत्र्यांचं आहे. ती जबाबदारी त्यांना पार पाडता येत नसेल तर त्यांनी पदावर राहू नये. तुम्हाला घरी बसवून ठेवण्यासाठी मुख्यमंत्री केलेलं नाही’, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी संताप व्यक्त केला.
‘मुख्यमंत्री प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यासाठीच बाहेर येणार का? लोकांचे दुःख जाणून घ्यायला कधी रस्त्यावर उतरणार?’, असे सवाल संदीप देशपांडे यांनी उपस्थित केले
‘रुग्णाला योग्य उपचार न मिळणं हे राज्य सरकारचं अपयश आहे. यातून कुणाचंही जाणं ही दुदैवी घटना आहे. एखाद्या पत्रकाराला बेड, रुग्णवाहिका तुम्ही मिळवून देऊ शकत नसाल तर मग तुम्ही लाखो-कोट्यवधी रुपये खर्च करुन उभारत असलेल्या कोव्हिड सेंटरचा काय उपयोग?’, असा प्रश्न संदीप देशपांडे यांनी उपस्थित केला.
‘कोव्हिड सेंटरमध्ये रुग्णांना उपचारच मिळत नसतील तर तिथे पैसे ओरपण्याचे काम सुरु आहे. तिथे जे रुग्ण बरे होत आहेत ते राम भरोसे होत आहेत’, असं संदीप देशपाडे म्हणाले.
‘पत्रकार पांडुरंग रायकर यांच्यासारख्या हजारो घटना गेल्या 5 महिन्यांत घडल्या आहेत. बीकेसी, नेस्को किंवा परवा पुण्यात उद्घाटन झालेलं कोव्हिड सेंटर असेल, यात लोकांना उपचार मिळत नसतील तर सरकारला लाज वाटली पाहिजे. मोठी मोठी कंत्राट द्यायची, पण त्याचा काय फायदा?’, असा सवाल संदीप देशपांडेंनी केला.
पत्रकार पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन
कोरोना काळात संयतपणे रिपोर्टिंग करणारे ‘टीव्ही 9 मराठी’चे पुणे प्रतिनिधी पांडुरंग रायकर यांचं कोरोनामुळे निधन झालं. ते 42 वर्षांचे होते. आज पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. धक्कादायक म्हणजे जम्बो कोव्हिड सेंटरमधून दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यासाठी अँब्युलन्सच मिळाली नाही. जेव्हा अँब्युलन्स उपलब्ध झाली, तोपर्यंत उशिर झाला होता.