मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी


मुंबई : मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी, अशी मागणी शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली आहे. अभिनेत्री कंगना रनौतने मुंबई आणि मुंबई पोलिसांविषयी वक्तव्य केल्यानंतर राजकीय वातावरण तापलं आहे. महाराष्ट्राच्या अस्मितेवर ड्रग्जच्या गुळण्या सहन करणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला. ‘ही मुंबई 106 हुतात्मांनी मिळवली आहे. या मुंबईचं रक्षण आमच्या पोलिसांनी केलं आहे. 26/11 हल्ला मुंबई पोलिसांनी परतवला, कसाबला याच पोलिसांनी पकडलं, अशा या मुंबई पोलिसांबद्दल कुणीही ऐरे-गैरे काहीही बोलत असतील, तर त्यांच्यावर राज्य सरकारने कारवाई करावी’ असे राऊत म्हणाले. ‘मी पोकळ धमक्या देत नाही, मी शिवसैनिक आहे, अॅक्शनवाला माणूस, नौटंक्या करत नाही, या काही मेंटल केस मुंबईत वाढल्या आहेत, त्यांच्यावर आरोग्य खात्याने उपचार करावे आणि महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांनी कारवाई करावी’ अशा शब्दात संजय राऊत यांनी कंगनावर हल्लाबोल केला.
‘मुंबईला पाकिस्तान म्हणणाऱ्यांना पाठीशी घालणारे जे कोणी आहेत, त्यांना मुंबईत मतं मागताना लाज वाटली पाहिजे, तुम्हाला POK ने मतं दिली का?’ असा सवाल संजय राऊत यांनी भाजप आमदार राम कदम यांना विचारला.
‘राम कदमांनी कंगना रनौतची तुलना झाशीच्या राणीशी करणं हा सर्वात मोठा अपमान आहे, झाशीची राणी ही महाराष्ट्राची वीरकन्या, महाराष्ट्राच्या अस्मितेवर गुळण्या टाकणाऱ्या कोणी स्वत:ला झाशीची राणी समजत असेल, आणि राजकीय पक्ष झाशीच्या राणीचा अपमान करणार असेल, तर राजकारण किती तळाला नेलंय हे स्पष्ट दिसतंय’ असेही संजय राऊत म्हणाले.
काय आहे प्रकरण ?
‘शिवसेना नेते संजय राऊत यांनी मला उघड धमकी दिली आणि मुंबईत पुन्हा पाऊल ठेवू नकोस असा इशारा दिला. याआधी मुंबईच्या रस्त्यांवर ‘आझादी’च्या घोषणा देण्यात आल्या. आता उघडपणे धमक्या मिळत आहेत. मुंबई पाकव्याप्त काश्मीरप्रमाणे का वाटत आहे?’ असा प्रश्न कंगनाने ट्विटरवरुन विचारला होता. यावर संजय राऊत यांनीही ट्विटरवर खेळण्यापेक्षा पोलिसांकडे पुरावे द्यावेत, असा टोला कंगनाला लगावला होता.
ट्विटरवर आपली बदनामी करणारे ट्वीट ‘लाईक’ करण्यावरुन कंगनाचे काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांशी वाजले होते. ‘सुशांतच्या मारेकऱ्यांविरुद्ध लढा देणाऱ्या लोकांची निंदा करणारे ट्वीट लाईक केले जात आहेत. छेडछाड आणि दमदाटीचा निषेध करण्याऐवजी मुंबई पोलीस आयुक्त त्यांना प्रोत्साहन देत आहेत. लज्जास्पद!!’ असे ट्वीट कंगनाने स्क्रीनशॉटसह केले होते.
‘बॉलिवूड माफियांपेक्षा मला मुंबई पोलिसांची जास्त भीती वाटते. त्यामुळे हिमाचल सरकार किंवा थेट केंद्र सरकारनेच मला सुरक्षा द्यावी’ असंही कंगना म्हणाली होती. आधी मुंबई पोलीस आणि नंतर मुंबईविषयी वक्तव्य केल्याने सर्वसामान्य नागरिकांनी कंगनाचा समाचार घेतला होताच. पण शिवसेना खासदार संजय राऊत, भाजप नेते निलेश राणे, काँग्रेस मंत्री नितीन राऊत अशी सर्वपक्षीय टीकाही तिच्यावर झाली.