शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे- भाजपचे नेते शिवाजी कर्डीले


अहमदनगर : महाविकास आघाडी सरकार पडेल, असे दावे भाजप नेत्यांकडून सातत्याने सुरु आहेत. त्यातच आता भाजपच्या एका मोठ्या नेत्याने एक वक्तव्य करुन राजकीय खळबळ निर्माण केली आहे. माजी मंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते शिवाजी कर्डीले यांनी आज राज्य सरकार आणि काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्यावर जोरदार टीका केली आहे. शरद पवारांना शिवसेना संपवायची आहे, असा आरोपदेखील त्यांनी यावेळी केला आहे.
कर्डीले म्हणाले की, शरद पवार सांगतायत की, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे कॅप्टन आहेत, मात्र त्यांना बाहेर फिरु दिले जात नाही. त्याचवेळी ते स्वतः मात्र या वयात सर्वत्र फिरत आहेत. शिवसेना संपवणे हा त्यामागचा एकमेव हेतू असल्याचे स्पष्ट दिसून येते. हे करत असताना राष्ट्रवादीला कशाप्रकारे ताकद मिळेल याचा प्रयत्नदेखील त्यांच्याकडून सुरु आहे.
कर्डीले म्हणाले की, हे सरकार अपयशी ठरल्याचे मी बोलत नाही तर सर्वसामान्य जनता तसं म्हणते. हे सरकार कोरोनाला रोखण्यात साफ अपयशी ठरलं आहे. अनेक ठिकाणी रुग्णांसाठी बेड उपलब्ध होत नाहीत, ऑक्सिजन उपलब्ध होत नाही. औषधेदेखील मिळत नाहीत. परंतु त्याच वेळी हॉस्पिटलची लाखो रुपयांची बिलं मात्र द्यावी लागतात. यावरुन स्पष्ट होतंय की, हे सरकार अपयशी ठरलं आहे.दरम्यान मागील आठवड्यात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीदेखील दावा केला होता की, महाविकास आघाडी सरकार पडणार आहे. पाटील म्हणाले होते की, महाविकास आघाडी सरकार त्यांच्या अंतर्विरोधामुळे पडणार आहे, आम्ही ते पाडण्यात भूमिका बजावणार नाही.
पाटील म्हणाले होते की, ‘गेल्या काही महिन्यांपासून चर्चा सुरु आहे की हे सरकार जाणार आहे. या चर्चेमध्ये कधीही माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी किंवा आमच्या कोणत्याही नेत्याने हे सरकार जाऊन तिथे आमचं सराक येणार असल्याचा दावा केलेला नाही. कारण हे सरकार जाण्यासाठी आम्ही कोणतेही प्रयत्न करत नाही. मात्र, उलट आम्ही म्हणतो की हे सरकार त्यांच्यातील अंतर्विरोधामुळं पडेल.
दरम्यान मागील आठवड्यात विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील असेच वक्तव्य केले होते. फडणवीस म्हणाले होते की, ‘महाविकास आघाडी सरकारचे जे काम सुरू आहे. त्यामुळे जनतेमध्ये प्रचंड आक्रोश आहे. त्यामुळे हे सरकार आपल्या कृतीमुळे कोसळेल, ज्यावेळी हे सरकार पडेल त्यानंतर आम्ही बघू. परंतु आम्हाला सरकार बनवण्याची सध्या कोणतीही घाई नाही.