महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा…


मुंबई : रविवारी राज्यभरात होणाऱ्या महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा पुढे ढकला अन्यथा त्यादिवशी राज्यभरात जी परिस्थिती निर्माण होईल याला राज्य शासन जबाबदार असेल असा इशारा खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी सरकारला दिला आहे.
याबाबत अधिक माहिती देताना संभाजीराजे म्हणाले की, राज्यात कोरोना बाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. ही संख्या नियंत्रणात अजूनही येतं नाही. अशा परिस्थितीत महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा घेणं म्हणजे कोरोना बाधित रुग्णांच्या संख्येत भर घालण्याचा प्रकार आहे. ही परीक्षा 200 जागांसाठी होणार आहे. आणि या परिक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल 2 लाखांच्या घरात आहे. जर यामध्ये कुठल्या विद्यार्थ्यांला कोरोनाची लागण झाली तर त्याची सरकार जबाबदारी घेणार आहे का? जर ही परीक्षा झाली तर मराठा समाजातील कार्यकर्ते प्रत्येक केंद्रावर जाऊन परीक्षा केंद्र फोडून टाकतील. आज 2 लाख विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असताना देखील सरकार परीक्षा घेतं असेल तर यामागे राजकीय षडयंत्र तर नाही ना याची देखील शक्यता नाकारता येतं नाही. हे षडयंत्र आम्ही होऊ देखील देणार नाही.
नवी मुंबईतील माथाडी भवन येथे राज्यभरातील मराठा क्रांती मोर्चाचे समनव्यक आणि विविध संघटनांच्या पदाधिकाऱ्यांची राज्यस्तरीय बैठक आयोजित करण्यात आली होती. त्या बैठकीला खासदार छत्रपती संभाजीराजे उपस्थित होते. यावेळी बोलताना संभाजीराजेंनी ही भूमिका मांडली. यावेळी राज्यभरातील काही एमपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही परीक्षा नाही झाली तर आमची वयोमर्यादा संपेल अशी भीती देखील व्यक्त केली. याला उत्तर देताना संभाजीराजे यांनी अशा विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये यासाठी त्यांची वयोमर्यादा वाढवून द्या अशी देखील सरकारकडे मागणी केली.