दिशा कायद्याप्रमाणे, त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करणार

अमळनेर | महिलांवर होणारा अत्याचार रोखण्यासाठी आंध्र प्रदेशातील दिशा कायद्याप्रमाणे कायदा अधिवेशनात मंजूर करण्यात येईल. त्याचबरोबर शेतकऱ्यांची फसवणूक रोखण्यासाठी लवकरच कायदा करण्यात येणार असल्याची घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.
रविवारी अनिल देशमुख यांच्या हस्ते अमळनेर येथील पोलीस वसाहतीचे उद्घाटन व एरंडोल पोलीस स्टेशनच्या नव्या इमारतीचे ऑनलाईन उद्घाटन झाले. त्यावेळी ते म्हणाले की, “शेतकऱ्यांच्या हितासाठी कायदा करणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य असेल”.
त्यावेळी वरणगाव येथे एसआरपीएफ बटालियन सुरु करण्यात येईल, अशीही घोषणा अनिल देशमुख यांनी केली. पाणीपुरवठामंत्री गुलाबराव पाटील यांनी गृहमंत्र्यांनी शेतकऱ्यांविषयी न्याय देण्याची मोहीम राबवल्याबद्दल आणि कायद्याची मागणी करणाऱ्या प्रतापराव दिघावकर यांचे अभिनंदन केले.
दरम्यान, पोलिस स्टेशनला आल्यावर महिलांना माहेरी आल्यासारखे वाटेल आणि पोलिस अधिकाऱ्याच्या समोर शेतकऱ्याला बसायला खुर्ची मिळेपर्यंत पोलिस स्टेशन लोकाभिमुख होणार नाही, असं प्रतापराव दिघावकर म्हणाले.