विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला दिसला -उपमुख्यमंत्री अजित पवार

मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी पत्रकार परिषद घेत राज्य सरकावर अनेक मुद्यांवरून टीका केली. यावेळी पत्रकार परिषदेला इतर भाजप नेतेही उपस्थित होते. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषदेवरून भाजपवर निशाणा साधला.
राज्यातील भाजप नेत्यांनी घेतलेली पत्रकार परिषद मीसुद्धा पाहिली. यामध्ये विधान परिषदेच्या निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे चंद्रकांतदादांचा चेहरा पडलेला दिसला आणि त्यांच्या पत्रकार परिषदेत उत्साह नव्हता, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
राज्यात अतिवृष्टी झाली, कोरना महामारीचे संकट आले, चक्रीवादळ आलं, राज्यात कपाशीचं नुकसान आलं, पीकांचं नुकसानही झालं. इतकी संकट आली असताना सरकार काम करत पुढं जात असल्याचं म्हणत पवारांनी विरोधकांचे सरकारच्या अपयशाचे आरोप फेटाळून लावले.
दरम्यान, आजपासून म्हणजेच सोमवार आणि मंगळवार या दोन दिवसांमध्ये हिवाळी अधिवेशन चालू होत आहे. अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सत्ताधाऱ्यांनी शासकीय चहापानाचा कार्यक्रम ठेवला होता. मात्र यावर भाजपने बहिष्कार टाकत राज्य सरकारवर टीका केली.