भाजपच्या आमदार श्वेता महाले यांचे अत्यंत खोचक ट्विट …

मुंबई : भाजपच्या आमदार श्वेता महाले यांनी या संपूर्ण घटनांवर एक अत्यंत खोचक ट्विट करून संताप व्यक्त करतानाच सरकारची लक्तरेच वेशीवर टांगली आहे. महाले यांचं हे ट्विट अत्यंत स्फोटक, खोचक, उपरोधिक आणि प्रचंड उद्वेग व्यक्त करणारं असून सरकारच्या जिव्हारी लागणारं असंच आहे. श्वेता महाले यांनी ट्विटरवर या संतापाला वाट मोकळी करून दिली आहे. “पूजा चव्हाणने आत्महत्या केली, हिरेन मनसुखने आत्महत्या केली, जळगावच्या ‘त्या’ महिलेने गर्मी होत होती म्हणून झगा काढून ठेवला होता. राज्यात महिलांवर होणारे अत्याचार, हत्यांच्या घटना आणि सरकारकडून मंत्र्यांची होणारी पाठराखण यावरून राज्यात संतापाचं वातावरण निर्माण झालं आहे.ज्यांच्यावर बलात्कार झालेत त्यात त्या महिलांची चुकी आहे, मुंडे, शेख, वाघमारे, राठोड अगदी निरागस आहेत आणि राज्याला धोका सचिन, लतादीदी, अमिताभ, अक्षयकडून आहे”, असा संताप महाले यांनी व्यक्त केला आहे. महाले यांच्या ट्विटमधील प्रत्येक ओळ न ओळ खोचक आहे. राज्यातील वास्तव परिस्थिती मांडणारी आहे. स्त्रियांच्या वेदना मांडणारी आहे. तसेच सरकारच्या दांभिक कारभारावर बोट ठेवणारीही आहे. राजकीय वर्तुळात महाले यांच्या या ट्विटची जोरदार चर्चा सुरू आहे.

पुरावे नष्ट होण्याची शक्यता

“मनसुख हिरेन प्रकरणाचा तपास एनआयएकडे जाईपर्यंत सर्व पुरावे नष्ट होण्याची शक्यता अधिक आहे. मग कुठलीही यंत्रणा लावा फार काही निष्पन्न होणार नाही, असे आधीच्या सुशांत व दिशा प्रकरणावरून लक्षात येऊ शकेल. त्यामुळे चार दिवस न्यूज चॅनेलला टीआरपी मिळेल, एवढंच काय यातून निष्पन्न होईल”, असा उद्वेगही त्यांनी व्यक्त केला आहे.

नेटकऱ्यांचा संताप –
श्वेता महाले यांनी सात तासांपूर्वी हे ट्विट केलं आहे. नेटकऱ्यांनीही त्यांच्या ट्विटवर प्रतिक्रिया व्यक्त करताना संताप व्यक्त केला आहे. काही नेटकऱ्यांनी तर महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणीच केली आहे. राज्यात ताबडतोब राष्ट्रपती राजवट लागू करा. महाराष्ट्र सरकार बरकातस्त करा. महाराष्ट्राला मविआ मुक्त करा. लगेच पोटनिवडणुका घेऊन भाजपचं सरकार आणावं, असं एका नेटकऱ्याने म्हटलं आहे. तर, दुसऱ्या नेटकऱ्याने राज्याचे गृहमंत्री हस्यास्पद असल्याची टीका केली.
कोण आहेत आमदार श्वेता महाले?
श्वेता महाले या बुलडाण्यातील चिखली विधानसभेच्या आमदार आहेत. भाजपच्या तिकीटावर त्या निवडून आल्या
2019 च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसच्या राहुल बोंद्रे यांचा पराभव केला. 2004 नंतर चिखली मतदारसंघात पहिल्यांदाच भाजप उमेदवाराचा इथे विजय झाला होता. श्वेता महाले या जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालकल्याण सभापती होत्या. त्यांना भाजपने 2019 मध्ये विधानसभेचं तिकीट दिलं होतं. मिळालेल्या संधीचं सोने करुन श्वेता महाले विधानसभेत पोहोचल्या.

Latest News