महाराष्ट्रावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचा प्रयत्न -संजय राऊत
मुंबई : मनसुखचा संशयास्पद मृत्यू झाला त्याचा मृतदेह मुंब्य्राच्या खाडीत सापडला हे सर्व प्रकरण म्हणूनच रहस्यमय झाले, पण रहस्य व सत्य यात फरक आहे. विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी गुप्तहेर शेरलॉक होम्सप्रमाणे या प्रकरणाचा तपास केला व काही गोष्टी समोर आणल्या. एखाद्या निष्णात फौजदारी वकिलाप्रमाणे संपूर्ण केस विधानसभेत मांडली. त्यांचे वकिलीचातुर्य या वेळी वाखाणण्यासारखेच होते, पण फौजदारी वकिलाने खटला कितीही रंगतदार केला तरी न्यायदान हे पुराव्यांवरच केले जाते. मुंबई पोलिसांच्या कार्यपद्धतीवरच विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले,
पण हेच पोलीस वर्षभरापूर्वी श्री. फडणवीस यांचे हुकूम ऐकत होते. अर्णब गोस्वामीसारख्यांना पोलिसांनी तेव्हा कोणाच्या हुकूमाने वाचविले?मुंबई-ठाण्याचे पोलीस व पोलिसांचा एक गट चालवणारी बाहय़ शक्ती गुंतली आहे. यातून पोलीस दलातील ‘गटबाजी’ व सौम्य टोळीयुद्ध पुन्हा उसळू लागले तर ते बरे नाही. पोलिसांनी भ्रष्टाचार करावा, पैसे गोळा करावेत, प्रोटेक्शन मनी घ्यावा यात आता काही नवीन राहिलेले नाही. देशभरातील पोलीस दलाची हीच कार्यपद्धती आहे असे लोक गृहीत धरूनच चाललेले असतात, पण पोलिसांत हिंसा, खंडणीखोरी व प्रसंगी अमली पदार्थांच्या व्यवहारातही पैसे मिळविण्याची प्रवृत्ती वाढीस लागली तर देशच संकटात येईल.
एखाद्या खोट्य़ा प्रकरणाचा डोलारा उभा करायचा व त्यात बडी नावे गुंतवून पैसे उकळायचे ही प्रवृत्ती सर्वच स्तरांवर वाढली आहे. पोलिसांचे चारित्र्य त्यामुळे बिघडले. म्हणून मुंबई पोलिसांनी तोंड काळे केले असे वक्तव्य श्री. फडणवीस यांनी केले, त्याचे समर्थन कोणीच करू नये. मनसुख हिरण प्रकरणात पोलिसांनी तोंड काळे केले असा आरोप विरोधी पक्षनेते करीत असतील तर अन्वय नाईक प्रकरणात कोणी तोंड काळे केले व हा कोळसा पोलिसांना पुरवणारे कोण होते?मनसुख हिरेन प्रकरणातील सत्य महाराष्ट्र एटीएसने लोकांसमोर आणायला पाहिजे. सरकारने कुणालाही पाठीशी घालू नये. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी चोवीस तासांत ‘एनआयए’ला केंद्राने घुसवले ते कशासाठी? केंद्रात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे म्हणून हे घडू शकले!
महाराष्ट्रासारख्या राज्यावर केंद्रीय तपास यंत्रणांचा दबाव टाकण्याचाच हा प्रकार आहे. अंबानींच्या घराबाहेरील जिलेटिन ठेवलेली स्कॉर्पिओ गाडी व त्या गाडीचा मालक मनसुख याच्या रहस्यमय मृत्यूचे प्रकरण विरोधी पक्षनेत्यांनी बऱ्यापैकी वाजवले. काही दशकांपूर्वी त्यावेळचे विरोधी पक्षनेते छगन भुजबळ यांनी किणी या इसमाच्या मृत्यूचे प्रकरण असेच रहस्यमय बनविले होते. भुजबळ तेव्हा किणी प्रकरणाचे तपास अधिकारीच झाले होते. किणी या मृताचा मेंदूही चोरण्यात आला असा भन्नाट आरोप करण्यापर्यंत किणी प्रकरण पोहोचले होते.