पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल – उपमुख्यमंत्री अजित पवार

माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये, यासाठी पोलिसांना अधिक दक्ष राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. गुन्ह्यातील रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग लक्षात घेता रेल्वे राज्यमंत्र्यांशी संपर्क साधून त्यांनाही अशा प्रवृत्ती रोखण्यासाठी सहकार्य करण्याची विनंती करण्यात येईल, अशी माहितीही अजित पवार यांनी दिली आहे.  पुण्यात अल्पवयीन मुलीवर झालेल्या बलात्काराची घटना लाजीरवाणी, संतापजनक आहे. या गुन्ह्यातील बहुतांश आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्वरीत आरोपींना अटक करण्याची कार्यवाही युद्धपातळीवर सुरु आहे. सर्व आरोपींना कठोर शिक्षा होईल याची संपूर्ण काळजी राज्य शासन घेईल, अशी ग्वाही यांनी दिली आहे. पुणे पोलिसांनी गुन्ह्याची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने तपासाची व आरोपींच्या अटकेची कारवाई केल्याचं अजित पवार म्हणाले.

घटनेचा आम्ही निषेध करत आहोत. संबंधितांना कठोरातील कठोर शिक्षा व्हावी यासाठी राज्यसरकार प्रयत्न करेल, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. तर माध्यमांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक यांनी विरोधी पक्ष राज्यात मुली सुरक्षित नाहीत असे बोलून राजकारण करत आहे, ते न करता आपल्या दिव्याखाली अंधार किती आहे हे पहावे, असा टोला त्यांनी भाजपला लगावला आहे. जे भाजप नेते राज्यसरकारवर आरोप लावत आहेत त्यांच्या खासदार, आमदारांनी आणि नेत्यांनी केलेले कुकर्म आठवावे. सेंगर, उन्नाव सारख्या व उत्तरप्रदेशमध्ये अशा अनेक घटना त्याकडे लक्ष द्यावे आणि मग अशाप्रकारचे आरोप करावे, असा खोचक सल्लाही नवाब मलिक यांनी दिला आहे. महाराष्ट्रात अशाप्रकारचे जो कुणी कुकर्म करेल तर त्याला सोडण्यात येणार नाही, असा स्पष्ट इशाराही मलिक यांनी दिला आहे. दरम्यान, पुणे सामुहिक बलात्कार प्रकरणात 11 लोकांना अटक झाली आहे. त्यांच्यावर लवकरात लवकर आरोपपत्र दाखल केले जाईल असंही मलिक यांनी यावेळी सांगितलं. पीडित 13 वर्षीय मुलगी ही 31 ऑगस्टच्या रात्री गावी जाण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर आली होती. यावेळी काही आरोपींना इतक्या रात्री तुला गाडी मिळणार नाही, असे सांगून रेल्वे स्थानकाबाहेर आणले. त्यानंतर तिचे अपहरण करत वानवडी परिसरात नेले आणि तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला. तब्बल दोन दिवस हा सर्व प्रकार सुरु होता. दरम्यान रविवारी (5 सप्टेंबर) सायंकाळी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली. वानवडी पोलिसांनी घटनेचे गांभीर्य ओळखून तात्काळ या प्रकरणी सामूहिक बलात्काराचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर आरोपींची ओळख पटवून तब्बल आठ जणांना अटक करण्यात आली. या संपूर्ण प्रकरणात आणखी काही आरोपींचा सहभाग असण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.

संबंधित घटना ही 31 ऑगस्ट ते 1 सप्टेंबर या कालावधीत घडल्याची माहिती पीडितेने दिली आहे. पीडितेने याबाबत पुण्यातील वानवडी पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पोलिसांनी घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन तातडीने कारवाई करण्यास सुरुवात केली. या कारवाई त्यांनी आठ आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.

Latest News