‘पर्यावरण पत्रकारिता फेलोशिप २०२२ ‘ चे वितरण हृषीकेश पाटील,श्रीकृष्ण काळे ठरले मानकरी

पुणे :पर्यावरण क्षेत्रात लिखाण करणाऱ्या पत्रकारांच्या प्रोत्साहनार्थ ‘तेर पोलिसी सेंटर’या संस्थेतर्फे देण्यात येणाऱ्या ‘पर्यावरणीय पत्रकारिता फेलोशिप’चे वितरण सोमवारी सायंकाळी ऑनलाईन कार्यक्रमात लेखक डॉ.उमेश करंबेळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

दहा हजार रुपयांची ही फेलोशिप मुक्त पत्रकार हृषीकेश पाटील(सावंतवाडी),श्रीकृष्ण काळे(लोकमत,पुणे) या दोन पत्रकारांना विभागून देण्यात आली.या फेलोशिपचे हे पहिलेच वर्ष आहे.पर्यावरणसंबंधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांकडून अर्ज मागविण्यात आले होते.ज्येष्ठ माध्यम तज्ज्ञ डॉ केशव साठ्ये यांनी परीक्षण केले.

लेखक डॉ.उमेश करंबेळकर म्हणाले,’पर्यावरणाचे प्रश्न वाढत असले तरी प्रत्यक्ष कृती करण्यावर भर दिला पाहिजे. पर्यावरण संवर्धनाचे काम घरातून सुरु झाले पाहिजे.खेडेगावातही कचरा समस्या उग्र होताना दिसत आहेत. झाडे लावण्याबरोबर संवर्धनाकडे लक्ष दिले पाहिजे. पत्रकारांकडून अपेक्षा वाढत आहेत. वृत्तपत्राचे माध्यम पर्यावरण संवर्धनाच्या बाबतीत जागृती निर्माण करण्यासाठी उपयुक्त ठरले पाहिजे. समस्येचे सर्व पैलू समोर आणले पाहिजेत.

डॉ केशव साठ्ये म्हणाले,’पर्यावरण संवर्धन हा व्यापक विषय आहे.पर्यावरण पूर्ण आपल्याला समजले आहे,असे म्हणता येणार नाही.ठिकठिकाणी पर्यावरण संवर्धनाचे प्रकल्प सुरु असले तरी त्याचे अनुकरण झाले पाहिजे.समाजाच्या लक्षात हे गांभीर्य येऊ लागले आहे.पत्रकारांनी पर्यावरणीय मुद्दे मांडल्यानंतर ती तडीस न्यावेत.माध्यमांनी पर्यावरण विषयक मजकुराला जास्तीत जास्त जागा दिली पाहिजे.

‘तेर पोलिसी सेंटर’च्या संचालक डॉ विनीता आपटे प्रास्ताविक केले. त्या म्हणाल्या,’माध्यमांद्वारे पर्यावरण संवर्धनाचा विषय पुढे जाण्यासाठी हा उपक्रम सुरु करण्यात आला.जागतिक पातळीवर तापमान वाढीचा विषय हाताळला जात आहे. शाश्वत विकासाची कास धरताना पृथ्वी जपण्याचा प्रयत्न पत्रकारांपासून सर्वांनी केली पाहिजे.जास्तीत जास्त सजगता निर्माण करण्यासाठी हा उप्रक्रम उपयुक्त ठरेल,अशी आशा त्यांनी व्यक्त केली.

मनोगत व्यक्त करताना हृषीकेश पाटील म्हणाले,’जागतिक तापमान वाढीच्या मुळे त्रस्त लोकांच्या व्यथा मला मांडायच्या आहेत.पश्चिम घाटावर तापमान वाढीचा जास्त परिणाम होत आहे.पाणी संपत आहे,प्राण्यांचे स्थलांतर वाढत आहे. श्रीकृष्ण काळे म्हणाले,’जैव विविधतेमध्ये कीटकांपासून सर्व जण आवश्यक असतात.त्या सर्व घटकांबद्दल मी लिहीत गेलो.पर्यावरण तज्ज्ञांना भेटत गेलो,वाचत गेलो.मी रोज पर्यावरण विषयक वाचन करतो.वृत्तपत्राबरोबर यू ट्यूब वरून मी विषय मांडत गेलो.शाश्वत विकासाचा विचार रुजवत राहिले पाहिजे. संयोजकांच्या वतीने डॉ.दीपक बीडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.पूजा नायक यांनी सूत्रसंचालन केले.

तेर पोलिसी सेंटर ही एक विना नफा या तत्वावर पर्यावरण संवर्धन क्षेत्रात काम करणारी स्वयंसेवी संस्था आहे, जी पर्यावरणाच्या शाश्वततेसाठी काम करते, तसेच वेगवेगळ्या माध्यमातून पर्यावरणीय क्षेत्रात काम करणाऱ्यांना प्रोत्साहन देते. याच धर्तीवर पर्यावरणसंबंधी लिखाण करणाऱ्या पत्रकारांकडून ‘पर्यावरणीय पत्रकारिता शिष्यवृत्ती २०२२’ साठी अर्ज मागवण्यात आले होते.

Latest News