माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान महागाई आहे- सुप्रिया सुळे

ठाणे : उत्तर प्रदेशमध्ये हजारो धार्मिक स्थळांवरील भोंगे हटवण्यात आले असून ३५ हजारांहून अधिक ठिकाणी भोंग्यांच्या आवाजावर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. याचवरुन आता महाराष्ट्र सरकारवर टीका केली जात असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना यासंदर्भात प्रश्न विचारण्यात आला. पत्रकार परिषदेमध्ये या प्रश्नाला उत्तर देताना हा विषय आपल्यासाठी महागाईपेक्षा अधिक महत्वाचा नसल्यांच सुळे यांनी म्हटलं. आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेमध्ये योगी सरकारने भोंगे उतरवल्यासंदर्भात सुप्रिया सुळे यांना प्रश्न विचारण्यात आला. त्यावर उत्तर देताना सुप्रिया यांनी, “खरं सांगू का माझ्यासमोरचं सर्वात मोठं आव्हान महागाई हे आहे. आता महागाईचं सर्वात मोठं आव्हान समोर असताना मला काही सुचतच नाहीय,” असं म्हटलं.
पुढे बोलताना सुप्रिया सुळे यांनी, “महागाई हा फार गंभीर मुद्दा आहे. विरोधक म्हणून मी हे बोलत नाहीय पण सर्वसामान्य जनतेसमोर कोणतं आव्हान आहे तर ते महागाईचं आहे. त्यामध्ये जातीने लक्ष घालून गांभीर्याने हे विषय आपण घेतले पाहिजेत,” असं म्हटलं.
मी नेहमीच महागाई विरोधात बोलत असते असं सुप्रिया यांनी सांगितलं. माझी लोकसभेमधील भाषणं ऐका त्यामधून तुम्हाला मी हा मुद्दा किती वेळा मांडते हे समजेल, असंही त्यांनी म्हटलं. फक्त आपल्या राज्यात महागाई नाही तर संपूर्ण देशात महागाई आहे, असंही सुप्रिया यांनी म्हटलंय. “भोंगा आणि बाकीच्या गोष्ठीत लक्ष घालत नाही,” असं त्यांनी स्पष्ट केलं. राज्याच्या राजकारणामध्ये सध्या उत्तर प्रदेशातील योगी सरकारने घेतलेल्या एका निर्णयावरुन वातावरण तापलं आहे