लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला…


मुंबई (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) – राज्याच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी महाविकासआघाडीने कंबर कसली असून त्यांचा जागा वाटपाचा फॉर्म्यूला ठरला असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
आगामी लोकसभेच्या निवडणुका अवघ्या एका वर्षावर आल्या आहेत. लोकसभा काबीज करण्यासाठी जवळपास सर्वच राजकीय पक्षांनी जोरदार तयारी केली आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या ४८ जागा असून या जागेवर निवडणूक लढवण्यासाठी महाविकास आघाडीमध्ये जागावाटपाचा फॉर्म्यूला ठरला आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एकूण ४८ जागांपैकी ठाकरे गट २१, राष्ट्रवादी १९ आणि काँग्रेस ०८ जागा लढवणार असल्याची शक्यता आहे. विशेष बाब म्हणजे यामधील मुंबईतील ०६ लोकसभा जागांपैकी ०४ जागा ठाकरे गट लढवेल तर राष्ट्रवादी आणि काँग्रेस प्रत्येकी १-१ जागा लढवणार असल्याची माहिती आहे.
२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांमध्ये युती होती. त्यावेळी दोघांनी मिळून ४८ पैकी ४१ जागांवर विजय मिळवला होता. यामध्ये भाजपचे २३ तर शिवसेनेचे १८ जागांवर उमेदवार निवडूण आले होते.उर्वरित ७ जागांपैकी ४ जागांवर राष्ट्रवादी कॉंग्रेस, तर एमआयएम आणि काँग्रेस पक्षाला प्रत्येकी १-१ अशी जागा मिळाली होती.
याशिवाय एका जागेवर अपक्ष उमेदवार नवनीत राणा यांचा विजय झाला होता. येत्या निवडणुकीत भाजपने ४५ जागांवर जिंकण्याचं ध्येय डोळ्यासमोर ठेवलं आहे.
शिवसेनेच्या बालेकिल्ल्यांवर भाजपची विशेष नजर असणार आहे. भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी चांगलीच कंबर कसली आहे. मोदींची प्रत्येक योजना ही सामान्यांपर्यंत पोहोचवा अशा सूचना देवेंद्र फडणवीस यांनी दिल्या आहेत. आता इतर पक्ष आपलं गणित कसं लावतात आणि हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.
लोकसभा निवडणुकीसाठी राज्यातील ४८ पैकी ५ ते ६ जागा अशा आहे ज्यावर महाविकास आघाडीमध्ये पूर्ण सहमती झालेली नाही. त्यामुळे या जागांमध्ये बदल होऊ शकतो. दुसरीकडे भाजपने देखील तिसऱ्यांदा सत्ता स्थापन करण्यासाठी प्लॅन केला आहे.भाजपने यावेळी आपल्या रणनीतीमध्ये मोठा बदल केला आहे.