”CAA”कायदा राज्यात लागू होऊ देणार नाही- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

मुंबई- “नागरीकत्व सिद्ध करणे हे फक्त मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल, त्यामुळे तो कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही”, असे विधान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले आहे. ‘सामना’चे संपादक संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांची मुलाखत घेतली होती. त्या मुलाखतीचा प्रोमो सामनाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरुन शेअर करण्यात आला. या प्रोमोमध्ये सीएए संदर्भात विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सीएए कायदा महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असे म्हटले आहे.

मागील अनेक दिवसांपासून मुख्यमंत्र्यांनी सीएए संदर्भातील भूमिका काय आहे, यासंदर्भात प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी अनेकांची मागणी होती. त्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचे सरकार असून राष्ट्रवादी व काँग्रेसने सीएए विरोधात भूमिका घेतली असताना त्यांच्यासोबत सत्ते असणारा शिवसेना हा पक्ष काय भूमिका घेतो याकडेच सर्वांचे लक्ष होते. शेवटी उद्धव ठाकरेंनी मौन सोडल आणि महाराष्ट्रात सीएए लागू होऊ देणार नसल्याचे मत व्यक्त केले.

मुख्यमंत्री प्रोमोमध्ये नेमकं काय म्हणाले?

संजय राऊत यांनी मुख्यमंत्र्यांना नागरिकत्व सुधारणा कायद्याविषयी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपली भूमिका काय?, असा प्रश्न विचारला. तसेच, बांग्लादेशी किंवा पाकिस्तानी घुसखोर जे आहेत त्यांना हाकलावंच लागेल या भूमिकेशी आपण ठाम आहात का?, असेही त्यांनी मुख्यमंत्र्यांना विचारले. त्यावर उत्तर देताना मुख्यमंत्री म्हणाले, “सीएए म्हणजे कोणालाही देशातून बाहेर काढण्याचा कायदा नाही. पण, नागरीकत्व सिद्ध करणे हे फक्त मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाईल, त्यामुळे असा कायदा मी महाराष्ट्रात येऊ देणार नाही.”

Latest News