आंबेडकरांच्या पायांची पूजा केली पाहिजे स्वत:ला ”हिंदू” म्हणवणाऱ्या स्त्रियांनी -विक्रम गोखले

पुणे: स्वत:ला हिंदू म्हणवून घेणाऱ्या स्त्रियांनी रोज डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पायांचं पूजन केलं पाहिजे, असं विधान ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी केलं आहे. पुण्यात रविवारी झालेल्या एका कार्यक्रमात त्यांनी हे वक्तव्य केलं. डॉ. आंबेडकरांनी हिंदू मॅरेज बिलाचा आग्रह धरला नसता तर हिंदू स्त्रियांचं काय झालं असतं ? असा सवालही त्यांनी केला.

स्वा. सावरकर वाङ्‍‍मय वक्त्तृत्व स्पर्धा समितीच्या वतीने ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांना जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. त्यावेळी त्यांनी हे विधान केलं. दै. लोकमत ने ही बातमी दिली आहे.

विक्रम गोखले म्हणाले, स्वा. सावरकरांचा विज्ञानवाद लोकांना पटत नाही. गाय हा पशू आहे, असं सावरकरांनी सांगितल्याने स्वत:ला हिंदू म्हणवणारा माणूस सावरकर यांच्यापासून दूर जातो ही दुर्दैवाची गोष्ट आहे. सावरकरभक्त किंवा सावरकरप्रेमी बनण्यापेक्षा सावरकर विचारप्रेमी व्हावे, सावरकरांचे विचारच देशाला वाचवू शकतील. हिंदु आणि हिंदुत्वाची व्याख्या सावरकरांकडून मिळते. ती समजून घेतल्याशिवाय गत्यंतर नाही.

सावरकर आणि आंबेडकर एकत्र आले असते तर आजचा भारत वेगळा दिसला असता. सावरकरांनी कधीही दुसऱ्या धर्माचा द्वेष केला नाही. त्यामुळे संपूर्ण सावरकर समजून घेण्यासाठी कदाचित दुसरा जन्म घ्यावा लागेल, असंही विक्रम गोखले म्हणाले.

सावरकरांची हिंदुत्वाची खरी व्याख्या समजून घ्यायला हवी. त्याचप्रमाणे ब्राह्मण ही जात नसून पदवी आहे, जो शुद्ध होतो तो बुद्ध होतो, असंही त्यांनी सांगितलं. समाजात नेहमी एकांगी विचार केला जातो आणि परंपरेने दिलेल्या गोष्टी पुढे घेऊन जाण्याकडे लक्ष दिलं जातं पण प्रत्येक गोष्टीचा दुसऱ्याही बाजूने विचार व्हायला हवा, असं विक्रम गोखले म्हणाले.

Latest News