36 अनधिकृत बंगले, प्रकरणी महापालिकेतील बीट निरीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करा – ॲड धम्मराज साळवे


पिंपरी (ऑनलाइन न्यूज परिवर्तनाचा सामना)
पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील चिखली येथे इंद्रायणी नदीच्या निळ्या पूररेषेत उभारलेल्या ३६ अनधिकृत इमारतींच्या प्रकरणी महापालिकेतील संबंधित बीट निरीक्षकांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ उपाध्यक्ष ॲड. धम्मराज साळवे यांनी केली आहे
कारवाई केवळ बांधकामे पाडण्यापुरती मर्यादित नसावी. विकासकांनी नागरिकांना बनावट कागदपत्रे दाखवून त्यांची फसवणूक केली आहे. या घोटाळ्यात काही स्थानिक नेत्यांचाही सहभाग असल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला आहे.
या विकासकांनी भारतीय दंड संहितेच्या कलम ४२० (फसवणूक), ४६८ (खोटी कागदपत्रे तयार करणे) आणि १२०(ब) (गुन्हेगारी कट) अंतर्गत गंभीर गुन्हे केले आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे
प्रमुख मागण्या: संबंधित विकासक, नेते आणि अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत.सर्व संबंधित बीट निरीक्षकांच्या मालमत्तेची आणि आर्थिक व्यवहारांची कसून चौकशी करावी.पूररेषा आणि जमिनीच्या वापरासंबंधी (झोनिंग) माहिती नागरिकांसाठी सहज उपलब्ध करावी.भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी निगराणी यंत्रणा आणि कार्यपद्धती तयार करावी.पर्यावरण संरक्षण कायद्यानुसार या गैरकृत्यासाठी जबाबदार असलेल्यांवर दंडात्मक कारवाई करावी.
या बेकायदेशीर बांधकामांना वेळीच का थांबवले नाही, असा सवाल उपस्थित करत ॲड. साळवे यांनी बांधकाम सुरू असताना संबंधित अधिकारी आणि बीट निरीक्षकांनी कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याचे निदर्शनास आणले.
उलट, काही अधिकाऱ्यांनी या बांधकामांना अप्रत्यक्षपणे प्रोत्साहन दिल्याचे दिसते, त्यामुळे त्यांची भूमिकाही सखोलपणे तपासण्याची गरज आहे, असे त्यांनी निवेदनात नमूद केले आहे.या अनधिकृत बांधकामांमध्ये गुंतवणूक करणाऱ्या अनेक नागरिकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. त्यांनी आपल्या आयुष्यभराची कमाई या घरांमध्ये गुंतवली, परंतु आता त्यांची घरे पाडण्यात आली आहेत. यामुळे त्यांचे केवळ आर्थिकच नव्हे, तर मानसिक खच्चीकरण झाले आहे. प्रशासनाने याप्रकरणी तातडीने जबाबदारी निश्चित करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी ॲड. साळवे यांनी केली आहे