”शपथ” आत्महत्या न करण्याची विद्यार्थ्यांना

राज्यात दहावीच्या परीक्षेला 3 मार्चपासून सुरुवात होत आहे. त्याआधी वाशिमच्या गौरीशंकर विद्यालयात विद्यार्थ्यांकडून आत्महत्या न करण्याची शपथ दिली.

वाशिम : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाच्या दहावी परीक्षेला उद्यापासून म्हणजेच 3 मार्चपासून सुरुवात होत आहे. दहावी परीक्षेच्या पार्श्वभूमीवर वाशिममधील एका शाळेने विद्यार्थ्यांना आत्महत्या न करण्याची शपथ दिली आहे. वाशिमच्या नालंदानगर भागातील गौरी शंकर विद्यालयात दहावीच्या निरोप समारंभ कार्यक्रमात विद्यार्थ्यांना ही शपथ देण्यात आली. कार्यक्रमात आठवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी ही शपथ घेतली.

पाचवी ते दहावीपर्यंतच्या गौरी शंकर विद्यालय शालेय शिक्षणाबरोबर दैनंदिन आयुष्यातील कठीण प्रसंगात मार्गदर्शन करण्याचं काम करतं. शालेय जीवनात कठीण प्रसंगी मी कुठल्याही परिस्थितीला न घाबरता आत्महत्या करणार नाही, अशी शपथ विद्यार्थ्यांना दिली जाते. ही शपथ भावी संघर्षमय जीवनात प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास विद्यार्थ्यांना वाटतो. तसंच घरातील सगळ्या सदस्यांनाही आत्महत्या करण्यापासून परावृत्त करु, असंही विद्यार्थ्यांनी सांगितलं.

शिंदे गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळाच्या जिल्ह्यात एकूण चार शाळा आहेत. आतापर्यंत या चार शाळांमधीलत एकाही विद्यार्थ्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचललं नसल्याचं सकारात्मक चित्र आहे, असं संचालक शांताबाई शिंदे यांनी सांगितलं. गेल्या काही वर्षांमध्ये विद्यार्थी आत्महत्यांच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली. गुण कमी मिळणं, नापास होण्याची चिंता कायमच विद्यार्थ्यांच्या मनात असते आणि आत्महत्यासारखं टोकाचं पाऊल उचलण्याचे विचार मनात येतात. मात्र हे  नकारात्मक विचार दूर करण्यासाठी या शाळेने घेतलेला शपथेचा उपक्रम, विद्यार्थ्यांच्या भावी जीवनात सकारत्मक  उर्जा आणि बदल घडवणारा आहे. इतर शाळांनी अशाप्रकारे विद्यार्थ्यांना जगण्याचं बळ दिल्यास येत्या काळात ‘विद्यार्थी आत्महत्या’ शब्द नाहीसा होईल.

Latest News