शिरूर: कारेगाव गणात मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा तब्बल 2700 मतांनी पराभव केला….

(ऑनलाईन परिवर्तनाचा सामना)- आयटी इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले या सरपंच झाल्यानंतर ‘उच्चशिक्षित सरपंच’ म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या. सोशल मीडियावर त्यांचे पाच लाखांहून अधिक फॉलोअर्स असून त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबरोबरच सामाजिक कार्यावरही लोकांचे लक्ष होते. याआधी त्या राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress Party – Ajit Pawar Group) कडून निवडणूक लढवून विजयी झाल्या होत्या, त्यामुळे पुन्हा त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात होती.राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांमध्ये सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या कारेगावच्या माजी सरपंच निर्मला नवले यांच्या निकालाकडे विशेष लक्ष लागले होते. त्यांच्या लक्झरी कार व्हिडीओमुळे त्या आधीच चर्चेत आल्या होत्या. मात्र या निवडणुकीत त्या विजयी ठरल्या की पराभूत,
याबाबत मतदारांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली होती.कारेगाव गावाच्या सरपंचपदावर असताना निर्मला नवले यांनी सोशल मीडियावर मोठी लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या युट्युब चॅनेलवर पती शुभम यांनी भेट दिलेल्या रेंज रोव्हर कारचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओत त्यांनी आपल्या स्वप्नातील कार मिळाल्याचा आनंद व्यक्त करताना लहान मुलासारख्या उड्या मारल्या होत्या, ज्यामुळे अनेक प्रतिक्रिया उमटल्या होत्या.मात्र मतमोजणीनंतर चित्र बदलले. या निवडणुकीत निर्मला नवले यांचा पराभव झाला असून मनीषा पाचंगे यांनी स्पष्ट विजय मिळवला आहे. कारेगाव गणात मनीषा पाचंगे यांनी निर्मला नवले यांचा तब्बल 2700 मतांनी पराभव केला. त्यामुळे सोशल मीडियावर लोकप्रिय असलेल्या या माजी सरपंचाला यावेळी मतदारांचा पाठिंबा मिळू शकला नाही. या निकालामुळे शिरूर तालुक्यातील राजकीय समीकरणांमध्येही बदल झाल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.राज्यातील 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी झालेल्या निवडणुकांमध्ये शिरूर पंचायत समितीचाही समावेश होता. कारेगाव गणातून निर्मला नवले यांना अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसने उमेदवारी दिली होती. त्यांच्या विरोधात भाजपच्या मनीषा पाचंगे मैदानात उतरल्या होत्या, त्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार अशी अपेक्षा होती.
