मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेस मोठा प्रतिसाद वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज

मुंबई दि. 29 जानेवारी 2019 :-

मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजनेत मार्च २०१९ अखेरपर्यन्त ५० हजार शेतकऱ्यांना वीजजोडणी देण्याचे महावितरणचे उद्दीष्ट असून या योजनेस राज्यातील शेतकऱ्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. महावितरणने पोर्टल सुरु केल्यानंतर केवळ दहा दिवसात सौर कृषिपंपाच्या वीजजोडणीसाठी 8 हजार 685 शेतकऱ्यांचे अर्ज प्राप्त झाले आहेत.

शाश्‍वत जलस्त्रोत उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना पारंपारिक वीजजोडणी मिळण्यात अडचणी आहेत. अशा भागात वीजजोडणीची मागणी करणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना प्राधान्याने सौर कृषिपंप देण्यात येणार आहेत. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी महावितरणने या योजनेच्या संदर्भात शेतकऱ्यांकडून वारंवार विचारण्यात येणारे प्रश्न व त्यांची उत्तरे असलेली मार्गदर्शन पुस्तिका तयार केली असून या पुस्तिकेचे वितरण सर्वत्र करण्यात येत आहे. याशिवाय योजनेची माहिती शेतकऱ्यांना व्हावी यासाठी महावितरणतर्फे मोठ्याप्रमाणात व्हॉट्स ॲपचा वापर करण्यात येत असून क्षेत्रीयस्तरावरील मुख्य अभियंता, अधीक्षक अभियंता व कार्यकारी अभियंता सोशल माध्यमांद्वारे शेतकऱ्यांसोबत संवाद साधत असल्यामुळे शेतकऱ्यांकडून या योजनेला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

शेतकऱ्यांना कृषिपंपाकरिता वीजजोडणी घेण्यासाठी महावितरणच्या वेबसाईटवर स्वतंत्र पोर्टल उपलब्ध करून देण्यात आले असून त्याचा लाभ घेत दि. 29 जानेवारी 2019 पर्यन्त राज्यातील सुमारे 8 हजार 685 शेतकऱ्यांनी सौर कृषिपंपासाठी अर्ज केले आहेत. विशेषत: मराठवाड्यातील शेतकऱ्यांकडून या योजनेला मोठा प्रतिसाद मिळत असून मागील दहा दिवसात 5 हजार 446 शेतकऱ्यांनी आपले अर्ज या पोर्टलवरून भरले आहेत. तरी या योजनेचा लाभ जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी घ्यावा, असे आवाहन महावितरणने केले आहे.

Latest News