दोन आमदाराचे राजीनामे: गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का

गांधीनगर : गुजरातमध्ये काँग्रेसला मोठा धक्का बसला. राज्यसभा निवडणुका तोंडावर असताना काँग्रेसच्या दोन आमदारांनी राजीनामा दिला. काँग्रेस आमदार अक्षय पटेल आणि जितू चौधरी यांनी सभापती राजेंद्र त्रिवेदी यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केले. दोन्ही आमदारांनी स्वेच्छेने राजीनामा दिला आहे. मी दोघांचे राजीनामे स्वीकारले आहेत, अशी माहिती राजेंद्र त्रिवेदी यांनी दिली. 19 जून रोजी राज्यसभेच्या चार जागांसाठी निवडणूक होणार आहे. अक्षय पटेल यांनी बडोद्यातील कर्जन मतदारसंघातून आमदारपदी निवडून आले होते. तर जितू चौधरी यांनी वलसाडच्या कपर्डा जागेवरुन विजय मिळवला होता. डिसेंबर 2017 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत दोघेही आमदार झाले होते. भाजपने राज्यसभा निवडणुकीसाठी अभय भारद्वाज, रमिला बारा आणि नरहरी अमीन यांना उमेदवारी दिली आहे, तर कॉंग्रेसने ज्येष्ठ नेते शक्तिसिंह गोहिल आणि भरतसिंग सोलंकी यांना रिंगणात उतरवलं आहे. राज्यसभेच्या केवळ चार जागा आणि पाच उमेदवार असल्याने निवडणूक रंगतदार होणार आहे. मार्चमध्ये काँग्रेसच्या पाच आमदारांनी राजीनामा दिला होता. 182 सदस्यसंख्या असलेल्या गुजरात विधानसभेत भारतीय जनता पक्षाकडे आता 103 आमदार आहेत, तर कॉंग्रेसचे 66 सदस्य आहेत. गुजरातमध्ये एका जागेसाठी 36 मतांची गरज असते. त्यामुळे काँग्रेसची दुसरी जागा सहा मतांनी धोक्यात आली आहे. दुसरीकडे, सत्ताधारी भाजप मात्र तीन जागा जिंकण्याच्या स्थितीत आहे. भाजपकडे 103 आमदारांचं संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपला तिसऱ्या जागेसाठी फक्त 5 मतांची बेगमी करण्याची आवश्यकता आहे. ‘भारतीय ट्रायबल पार्टी’चे दोन, राष्ट्रवादीचा एक, तर एक अपक्ष आमदार आहे.