काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा- केंद्रिय मंत्री रामदास आठवले

मुंबई : राज्यात एकीकडे कोरोनाच हाहाकार दिवसेंदिवस वाढतच चालला आहे तर दुसरीकडे राजकीय गदारोळ सुरूच आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात शाब्दिक चकमक होताना पाहायला मिळत आहे. या सर्व परिस्थितीमध्ये आता केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी देखील उडी घेतली आहे. कारण राज्य सरकारमध्ये महत्त्वाचे निर्णय घेताना काँग्रेसला विचारात घेतले जात नाही त्यामुळे काँग्रेसने राज्य सरकारचा पाठिंबा काढून घ्यावा असा सल्ला आठवले यांनी दिला आहे.
शिवसेना आणि राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री काँग्रेसला ग्राह्य धरत निर्णय घेत असल्याची खदखद काँग्रेस नेत्यांच्या मनात आहेत. याच पार्श्वभूमीवर केंद्रिय मंत्री रामदास आठवले यांनी काँग्रेसला हा सल्ला दिला आहे.
महाराष्ट्रात तिघाडी सरकार मध्ये बिघाडी झाली आहे. काँग्रेस पक्षाच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सरकार स्थापन झाले आहे. मात्र काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसल्याची नाराजी काँग्रेसने व्यक्त केली आहे. काँग्रेसला विश्वासात घेतले जात नसेल तर त्यांनी राज्य सरकारचा पाठिंबा काढावा, असा सल्ला आठवले यांनी महाराष्ट्र काँग्रेसला दिला आहे.
रामदास आठवले यांनी ट्विट करून काँग्रेसला सल्लावजा आव्हान देत ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेत सरकारमधून बाहेर पडावं असं म्हटलं आहे. गेल्या 1 महिन्यांपूर्वी देखील त्यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधत हे सरकार लवकरच पडणार असल्याची भविष्यवाणी केली होती. दरम्यान, निर्णयप्रक्रियेत सहभागी करून घेत नसल्याची खदखद काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी बोलून दाखवली आहे. तसंच मंत्र्यांमध्ये देखील याचविषयी निराशा आहे. याच पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट देखील घेतली आहे.