कोल्हापूर सज्ज झाले महापुराचा सामना करायला

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात चार दिवसाच्या दमदार हजेरीनंतर पावसाने काहीशी उघडीप दिली आहे. काल सायंकाळपासून कोल्हापूर परिसरात पाऊस थांबल्याने पंचगंगा नदीची पाणी पातळीदेखील 25 फुटांवर स्थिर आहे. शहर आणि उपनगराच्या भागात पावसाने विश्रांती घेतली असली तरी धरणक्षेत्रात मात्र पाऊस सुरुच आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठ्यात वाढ होत आहे. पंचगंगेची इशारा पातळी 39 फूट तर धोका पातळी 43 फूट इतकी आहे. गेल्या वर्षी महापुरात पाणी पातळी सर्वाधिक 56 फूट इतकी पोहोचली होती.गेल्या चार दिवसापासून धरणसाठ्यात होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर राधानगरी आणि कोयना धरणातून पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे पाऊस थांबला असला तरी नदीकाठच्या गावांना खबरदारीच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.

पश्चिम भागात पावसाचा जोर

कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचा जोर पाहायला मिळाला. चार दिवसांपासून या परिसरात संततधार सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पाऊस असल्याने धरणांच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. पंचगगा नदीची पाणी पातळी 25 फुटांवर पोहोचली आहे.पंचगंगा नदीचं विस्तारलेलं पात्र पाहून कोल्हापूरकरांना मागील वर्षीच्या महापुराची आठवण करुन देत आहे. पहिल्याच पावसात बंधारे पाण्याखाली गेल्याने नदीकाठावरील गावांना धडकी भरली आहे.

गेल्यावर्षीचा महापुराचा अनुभव पाहता यावर्षी पूर्वतयारी म्हणून एनडीआरएफच्या टीम 15 जूनपासून जिल्ह्यात आणण्याच्या प्रयत्नात प्रशासन होतं. मात्र याला तांत्रिक अडथळा आला आहे. त्यामुळे जुलै महिन्यापर्यंत तरी जिल्हा प्रशासनाने सोबतच नागरिकांनादेखील सतर्क राहावं लागणार आहे.

गेल्यावर्षीचा महापुराचा अनुभव पाहता यावर्षी जिल्हा प्रशासनाने संभाव्य महापुराचा सामना करण्यासाठी कंबर कसली आहे. पालकमंत्री सतेज पाटील यांनी या तयारीची सूत्रे हातात घेतली असल्यानं सगळ्या यंत्रणा कामाला लागल्या आहेत. संभाव्य पूरस्थितीच्या संदर्भात काल झालेल्या आढावा बैठकीत नदीकाठच्या गावांमधील स्थलांतराबाबत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. एरव्ही पंचगंगा नदीची पाणी पातळी 43 फुटांवर गेल्यावर स्थलांतराबाबत हालचाली सुरु होत असत. मात्र यावेळेस पाणी पातळी 39 फुटांवर आल्यानंतर स्थलांतर सुरु करण्यात येणार आहे.

संभाव्य पूरस्थितीचा सामना करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा प्रशासनाची तयारी

  • जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून यांत्रिक बोटी, लाईफ जॅकेटसह प्रशिक्षित गार्ड सज्ज
  • सध्या जिल्ह्यात 20 तर कोल्हापूर महानगरपालिकेकडे 11 बोटी उपलब्ध आहेत, आणखी 25 बोटी घेण्यासाठी हालचाली सुरु आहेत.
  • पूरपरिस्थिती ट्रान्सफॉर्मर खराब होण्याची शक्यता असल्याने 75 नवीन ट्रान्सफॉर्मर तसंच 2 हजार पोल तयार ठेवण्यात आले आहेत.
  • एमएसईबी कर्मचाऱ्यांसाठी 50 लाईफ जॅकेट मागवण्यात आलेत
  • जमिनीलगत असलेल्या ट्रान्सफार्मर तसंच भूमीगत वायरसह अन्य अडथळ्यांची माहिती व्हावी यासाठी मॅप मार्कर अॅप तयार
  • पाणी पातळी वाढल्यावर कोणते रस्ते बंद होतील याची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्याची व्यवस्था

दरम्यान या तयारीचा एक भाग म्हणून 15 जूनपर्यंत एनडीआरएफच्या टीम जिल्ह्यात याव्यात यासाठी जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी पत्रव्यवहार केला होता. मात्र आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्याशिवाय एनडीआरएफ टीम पाठवता येत नसल्याचे कारण देत जुलैमध्ये या टीम उपलब्ध करून देणार असल्याचे एनडीआरएफकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.

Latest News