पुण्यात एल्गार परिषदेला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी- ब्राह्मण महासंघ


पुणे: पुण्यात एल्गार सांस्कृतिक परिषदहोणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. या कार्यक्रमाला परवानगी मिळावी, अशी मागणीही स्वारगेट पोलिसांकडे करण्यात आली आहे. तर दुसरीकडे एल्गार परिषदेला सर्वांगीण अभ्यास करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे केली आहे. त्यामुळे पुण्यात ऐन कोरोनाच्या काळात एल्गार परिषदेवरून वाद पेटण्याची चिन्ह दिसत आहे. यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा )परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे.
काय आहे ब्राम्हण महासंघाची भूमिका?
आनंद दवे यांनी ‘News18 लोकमत’शी बोलताना सांगितलं की, पहिल्या एल्गारची जेव्हा जाहिरात केली जात होती. भित्ती पत्रके, बॅनर लावले जात होते. त्यावरील मजकूर वाचून त्यातून जातीय भावना दुखावल्या जाण्याची भीती आम्ही त्यावेळीही व्यक्त केली होती. त्यास परवानगी देऊ नये अशी विनंती आम्ही शासनाकडे त्या वेळेसही केली होती. पुन्हा एकदा एल्गारची तयारी होत असल्याचं समजते आहे.
आयोजक, वक्ते, विचार हे सर्व जर तेच असतील तर पुन्हा त्या व्यासपीठावरून त्याच त्याच भूमिका मांडल्या जाण्याची शक्यता जास्त आहे. अशा वेळेस शासनाने सर्व बाबी तपासूनच त्यास परवानगी द्यावी. भाषणास चौकट घालून बंदिस्त करता येत नाही, बोलणारा बोलून जातो आणि रेकॉर्डिंग मागवले आहे, चौकशी करू हे सरकारी उत्तर ठरलेले असते. अभिव्यक्ती स्वातंत्र्य, सभेचा अधीकार मान्य करून प्रशासनाने सर्वागीण विचार करूनच परवानगी द्यावी, अशी मागणी आनंद दवे यांनी केली आहे.
दरम्यान, कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभाला मानवंदना देण्यासाठी दरवर्षी 1 जानेवारीला देशभरातील अनुयायी येत असतात. याच निमित्ताने यंदाही पुण्यात एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. पुण्यातील गणेश क्रीडा कला केंद्रात ही परिषद घेण्याचा निर्णय पुण्यात झालेल्या बैठकीत घेण्यात आला आहे, अशी माहिती परिषदेकडून देण्यात आली आहे.
दोन वर्षांपूर्वी झालेल्या एल्गार परिषदेशी संबंधीत काही विचारवंत आणि दिग्गजांवर कारवाई करण्यात आली होती. तसंच या प्रकरणाची चौकशी राष्ट्रीय तपास यंत्रणाकडे ( NIA)देण्यात आला आहे.
कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचे आवाहन
यंदा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा परिसरात गर्दी न करण्याचं आवाहन राज्य सरकारकडून करण्यात आलं आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनाप्रमाणे 1 जानेवारी रोजी कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभचं देखील दूरदर्शन आणि सोशल मीडियावरून दिवसभर प्रसारण सुरू राहणार आहे. मात्र. कोरेगाव-भीमा येथील विजयस्तंभ परिसरात कोणत्याही राजकीय सभा अथवा पुस्तकांचे स्टॉल लावण्यास मनाई करण्यात आली आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने हा निर्णय घेतला आहे.