गृहमंत्री बदलला जाणार नाही :राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटिल


मुंबईत कारमध्ये स्फोटकं सापडल्याप्रकरणी पोलीस अधिकारी सचिन वाझे अटक आण माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्या पत्रामुळे राज्यातील राजकारण ढवळून निघाले आहे. राज्यात सध्याचे निर्माण झालेल्या परिस्थितीवरून भाजपाकडून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची मागणी करण्यात आली आहेत आणि या मागणीवरून राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व मंत्री जयंत पाटील यांनी भाजपला टोला लगावला आहे.
‘महाराष्ट्रात काही झालं तरी राष्ट्रपती राजवट लागू झाली पाहिजे अशी मागणी होते आणि राज्यातल्या भाजपाकडून आतापर्यंत आठ ते नऊ वेळा अशी मागणी करण्यात आलेली आहे. तसंच महिन्यातून विरोधकांकडून एक दोन वेळा तरी राष्ट्रपती राजवटीची मागणी होत असते आणि त्यात नवीन काय आहे, अशा शब्दात जयंत पाटलांनी भाजपाला राष्ट्रपती राजवट मागणीवरून टोला लगावला आहे.
तसंच, सचिन वाझे आणि परमवीर सिंग यांच्या आरोपानंतर गृहमंत्री आणि राज्याच्या मंत्रिमंडळात बदलाची चर्चा सुरू आहे. यावर बोलताना जयंत पाटील म्हणाले की, ‘राज्याच्या मंत्रिमंडळात कोणत्याही प्रकारच्या बदलाची आवश्यकता नाही आणि आमच्या मनात असा विचारही नाही’ असं सांगत गृहमंत्री बदलला जाणार नाही असं जयंत पाटील यांनी स्पष्ट केलं आहे.