मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी…

padalkar-ud

मुंबई |काल रात्रीचं फेसबुक लाईव्ह नेमकं कशासाठी होतं? मुख्यमंत्र्यांनी वारंवार लॉकडाऊन आणि बेरोजगारी या दोन गोष्टींचा उल्लेख लाईव्हमध्ये केला हे दुर्दैवी आहे. यानं सामान्य जनतेत काय संदेश जातोय? आता जनतेच्या मनात दहशत निर्माण करण्याचं काम सरकारनं करु नये. इथे लोकांच्या जीवन मरणाचा प्रश्न उभा राहिला आहे आणि तुम्ही लॉकडाऊन- लॉकडाऊन हा काय खेळ लावलाय? वर्षभरात काय केलं तुम्ही?, असा प्रश्न पडळकरांनी उद्धव ठाकरेेंना विचारला.एक वर्ष झालं तरी तेच तेच पाल्हाळिक बोलताय. कोरोनाचा प्रसार तुम्हाला रोखता आला नाही. हे आतातरी स्पष्टपणे कबूल करा. कुठं नेऊन ठेवलाय महाराष्ट्र माझा? लॉकडाऊन हा पर्याय नाही, लॅाकडाऊन शिवाय करोना नियंत्रणात येईल. पण दरवेळेला जनतेला गृहीत धरुन मनमानी कारभार रेटायचा बंद करा. बरं यातही सगळं लोकांनीच करावं, जनतेनं रोखावं किंवा जबाबदारीनं वागावं, तर मग तुम्ही काय फक्त कपडे बदलून फेसबुक लाइव्ह करायला मुख्यमंत्री झालात का? जनतेला रस्त्यावर उतरून दाखवा म्हणणाऱ्यांनी आधी खुर्चीवरून उतरून दाखवावं, अशी बोचरी टीका पडळकरांनी केलीये. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी फेसबुक लाईव्हद्वारे महाराष्ट्राच्या जनतेला संबोधित केलं. यावेळी उद्धव ठाकरेंनी येत्या दोन दिवसांत परिस्थितीचा आढावा घेऊन लॉकडाऊनबाबत निर्णय घेऊ, असं म्हणत लॉकडाऊनचे संकेत दिले. यावरून मुख्यमंत्र्यांनी लॅाकडाऊनविषयी जनतेच्या मनात भीती पसरवू नये, अशी टीका आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. दरम्यान, सरकारचं सगळं पाप जनतेच्या माथी मारून जनतेलाच ‘बेदरकार’ म्हणायचं, राज्याचे प्रश्न सोडून बंगालमध्ये ममता दीदीनं लावलेल्या ‘दिव्याचं’ कौतुक करायचं आणि महाराष्ट्र सरकारनं केलेल्या अंधाराकडं दुर्लक्ष करायचं असा उठसुठ सामानाच्या अग्रलेखातून बरळणाच्या उद्योग सुरू आहे, असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

Latest News