पुणे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी अत्यावश्यक सेवा दुकानांना तंबी….

पुणे | पुणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागातून जीवनावश्यक वस्तू मोठ्या प्रमाणात शहराकडे पाठवण्यात येत असतात. त्यामध्ये किराणा सामान, भाजीपाला, फळे, दूध, बेकरी यांसारख्या वस्तूंचा समावेश असतो. संबंधित माल हा शहराकडे पाठवताना त्या ठिकाणी गर्दी होत असते. दुकानांच्या ठिकाणी गर्दी होणार नाही, याची खबरदारी उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावी. आवश्यकता भासल्यास संबंधित दुकाने बंद करण्याचा निर्णय उपविभागीय अधिकाऱ्यांनी घ्यावा, असं राजेश देशमुख यांनी आदेशात म्हटलं आहे.

जिल्ह्याच्या ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये धर्मिक स्थळी विवाह होत असतात. मात्र धार्मिक स्थळे ही बंद असल्याने नागरिकांची अडचण होत आहे. ही बाब विचारात घेऊन जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनी धार्मिक स्थळी विवाह समारंभ घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, राज्य सरकारच्या निर्देशानुसार 25 लोकांच्या मर्यादित उपस्थितीत विवाह समारंभ करणं बंधनकारक असल्याचं आदेशात स्पष्ट करण्यात आलं आहे.कोरोनाच्या वाढत्या पार्श्वभूमीवर राज्यात 30 एप्रिलपर्यत संचारबंदी लावण्यात आली आहे. तर राज्यात फक्त अत्यावश्यक सेवा चालू ठेवण्यात आल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर प्रशासनाने पुण्यात आता कडक नियम लागू केले आहेत. मोकळी जागा उपलब्ध नसेल आणि गर्दी नियंत्रणात आणणं शक्य होत नसेल, तर ती दुकाने बंद करण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी दिले आहेत.

दरम्यान, प्रत्येक तालुक्यात उपविभागीय अधिकाऱ्यांची कोरोना प्रतिबंधक उपाययोजना साठी ‘इनसिडेंट कमांडर’ म्हणून नेमणूक केली आहे. त्यामुळे पुण्यात आता सार्वजनिक ठिकाणी होणारी गर्दी टाळण्यासाठी प्रशासन कडक कारवाई करताना दिसत आहेत.