भाजपचा आमदार फुटला आणि पुन्हा पोटनिवडणुक घ्यावी लागली तर….

पंढरपूर | देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपूर – मंगळवेढ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पैसे आणू असं सांगितलं आहे. योजना पूर्ण करण्याची महाराष्ट्र सरकारमध्ये ताकद आहे, पण हे पैसे तुम्हाला कुणी मागितले?, असा खोचक सवाल पाटील यांनी फडणवीसांना विचारलाय. पंढरपूर – मंगळवेढ्याच्या जनतेची इतकी काळजी होती तर मागच्या 5 वर्षांत कामे का नाही केली? आता भाजपचा आमदार फुटला आणि पुन्हा पोटनिवडणुक घ्यावी लागली तर आश्चर्य वाटू देऊ नका, असं वक्तव्य जयंत पाटील यांनी केलं आहे.पंढरपूर – मंगळवेढा या मतदारसंघासाठी भारतनानांनी बरेच कष्ट घेतले आहेत. म्हणूनच पंढरपूर मंगळवेढ्याच्या जनतेने भल्याभल्यांना बाजूला ठेवून तीन वेळा भारतनानांना निवडून दिलं. आजही तीच परिस्थिती आहे. काहींनी धनदांडग्यांना उमेदवारी दिली असली तरी लोकांनी भगीरथ भालके यांना खंबीर पाठिंबा दिला आहे, असं जयंत पाटील म्हणाले.सध्या राज्यात पंढरपूर – मंगळवेढा पोटनिवडणुकीचं बिगुल वाजलं आहे. या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या भगीरत भालके यांचा थेट सामना भाजपच्या समाधान अवताडे यांच्याशी आहे. भाजपकडून खुद्द देवेंद्र फडणवीस प्रचारासाठी मैदानात उतरले आहेत. यातच दोन दिवसांपासून पंढरपूरात तळ ठोकून बसलेल्या जयंत पाटलांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली आहे. मधल्या काळात बरेचजण आम्हाला सोडून गेले, पण भारतनानांनी विरोधी विचारांची कास धरली नाही. आमच्या पडत्या काळात आम्हाला साथ दिली. अडचणीच्या काळात जे साथ देतात त्यांना आपण कधीच विसरत नसतो, आम्हीही भारतनाना आणि त्यांच्या कुटुंबाला सदैव साथ देणार, असं म्हणत जयंत पाटलांनी भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केलंय.