‘स्वातंत्र्य लढ्यातील योगदानासोबत वनवासी बांधवांचे संस्कृती रक्षणाचे कार्य समाजापुढे आणावे- राज्यपाल भगतसिंह कोश्यारी


राज्यपालांच्या हस्ते संस्कृती जागरण मंडळाच्या सांस्कृतिक विशेषांकाचे प्रकाशन
पुणे- २७ जान “देशातील वनवासी, जनजाती व आदिवासी बांधवांचे स्वातंत्र्य लढ्यातील योगदान जसे मोठे आहे, तसेच धर्मांतर करणाऱ्या शक्तींचा विरोध करून संस्कृती रक्षणाचे त्यांचे कार्य देखील महत्वाचे आहे.वनवासी बांधवांच्या शीघ्रतम विकासासाठी कार्य करताना त्यांचे संस्कृती रक्षणाचे कार्य देखील समाजापुढे आणले पाहिजे”, असे आवाहन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी आज येथे केले.संस्कृती जागरण मंडळ व जनजाती विकास मंचतर्फे ‘स्वातंत्र्यलढ्यातील जनजातींचे योगदान’ या विषयावरील प्रजासत्ताक दिन विशेषांकाचे प्रकाशन राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते बुधवारी (दि. २६) राजभवन, मुंबई येथे करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाला जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराड, सांस्कृतिक वार्तापत्राचे सचिव शिरीष पदे, वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनिता पेंढारकर, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कोकण प्रांताचे कार्यवाह विठ्ठल कांबळे,अजय मुडपे व इतर निमंत्रित उपस्थित होते.
स्वातंत्र्यप्राप्तीनंतर अनेक क्षेत्रात महिलांची प्रगती होऊन त्या पुढे आल्या.अनुसूचित जाती प्रवर्गातील लोकांची देखील प्रगती झाली. मात्र वनवासी बांधव विकासापासून अजूनही दूर आहेत.आजही अनेक आदिवासी भागांमध्ये रस्ते,दूरसंचार,वीज आदि सेवा पोहोचल्या नसून वनवासी बांधवांच्या विकासासाठी शीघ्रगतीने प्रयत्न होणे गरजेचे आहे असेही राज्यपालांनी सांगितले.
स्वातंत्र्य लढ्यातील जनजातीचे योगदान या विषयावरील विशेषांक प्रसिद्ध करून संस्कृती जागरण मंडळाने राज्यातील तसेच देशातील अनेक ज्ञात व अज्ञात वनवासी बांधवांच्या स्वातंत्र्य संग्रामातील योगदानाची अभ्यासपूर्ण माहिती समोर आणल्याबद्दल राज्यपालांनी संपादिका सुनीता पेंढारकर व त्यांच्या सहकाऱ्यांचे अभिनंदन केले.
नरेश मराड यांनी यावेळी जनजाती विकास मंचची माहिती दिली.सांस्कृतिक वार्तापत्रचे कार्यवाह शिरीष पदे यांनी आभार मानले.
सुनीता पेंढारकर
9604993715
व्यवस्थापिका
सांस्कृतिक वार्तापत्र
पुणे
………………………………………………….
फोटो ओळ
स्वातंत्र्य लढ्यातील जनजातीचे योगदान या विषयावरील प्रजासत्ताक दिन विशेषांकाच्या प्रकाशन प्रसंगी अतिथी संपादक मुकुंद कानडे,सांस्कृतिक वार्तापत्र कार्यवाह शिरीष पदे, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी,जनजाती विकास मंचचे अध्यक्ष नरेश मराड,सांस्कृतिक वार्तापत्राच्या व्यवस्थापिका सुनीता पेंढारकर