महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे साहित्य भारत जोडो यात्रेस भेट देणार – स्वराज अभियान ‘

FB_IMG_1665235537137

****** महाराष्ट्रातील पुरोगामी विचारांचे साहित्य भारत जोडो यात्रेस भेट देणार – स्वराज अभियान ‘

मराठीचिये नगरी। ब्रह्मविद्येचा सुकाळ करी।’ म्हणणारे ज्ञानोबा आणि ‘आम्हां घरीं धन शब्दांचीच रत्ने। शब्दांचीच शस्त्रें यत्न करूं।’ असे म्हणणाऱ्या तुकोबांपासून महाराष्ट्रातील पुरोगामी विचार गंगेचा उगम होतो. या पुरोगामी विचार गंगेला आजपर्यंत अनेक विचारप्रवाह येऊन मिळाले आहेत. त्यामुळेच महाराष्ट्र नेहमीच पुरोगामी विचारांचा एक बालेकिल्ला बनून राहिला आहे.

ही पुरोगामी विचारगंगा जीवंत ठेवण्यासाठी महाराष्ट्रीय विचारवंतांनी आपल्या प्राणांची आहुती देखील दिली आहे. हे पुरोगामी साहित्य संत साहित्य, वैचारिक ग्रंथ, निबंध, आत्मचरित्र, कथा, कादंबऱ्या आणि कवितासंग्रह इ. विविध स्वरुपात प्रसिद्ध झाले आहे

. या साहित्याने महाराष्ट्राची वैचारिक जडणघडण केली आहे. हे पुरोगामी साहित्य एकत्र करून भारत जोडो यात्रेस भेट म्हणून देण्याचा संकल्प स्वराज अभियान व स्वराज इंडियाच्या वतीने ललित बाबर, सुभाष लोमटे, मानव कांबळे आणि संजीव साने यांनी केला आहे. १० नोव्हेंबर रोजी भारत जोडो यात्रेचे नांदेड जिल्यातील देगलूर येथे महाराष्ट्रात आगमन करणार आहे. ही यात्रा २६ नोव्हेंबर पर्यंत मराठवाडा व विदर्भातील काही जिल्ह्यांत फिरून पुढे मध्य प्रदेशात जाणार आहे

. त्यावेळी हे साहित्य स्वराज इंडियाचे नेते योगेंद्र यादव यांच्या हस्ते भारत जोडो यात्रेचे नेते राहुल गांधी यांच्याकडे सुपूर्द करण्यात येणार आहे. समतेचा विचार देणाऱ्या ज्ञानोबा तुकोबांपासून, राजर्षी शाहू महाराज, महात्मा ज्योतीराव फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि एकविसाव्या शतकातील समकालीन विचारवंत, लेखक, कवींच्या ग्रंथसंपदेचा यामध्ये यामध्ये समावेश असणार आहे

. हे साहित्य जमा करण्यासाठी विदर्भात विलास भोंगाडे (९८९०३३६८७३) मराठवाड्यात सुभाष लोमटे (९४२२२०२२०३), पश्चिम महाराष्ट्रात ललित बाबर (९८६९४४१५०७, ८६२५९४०३८३) पुणे-नाशिक इब्राहीम खान (९८२२०६६०५०) आणि मुंबई, कोकण प्रा. श्याम पाखरे (९९६०३३५८५४) आणि वंदनाताई शिंदे (९८६९१५१६७९), यांच्याशी संपर्क साधावा.

साहित्याची निवड करण्यासाठी डॉ. लता प्र. म., जयदेव डोळे, सुभाष वारे व प्रा. श्याम पाखरे यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. गेल्या काही वर्षांपासून प्रतिगामी जातीयवादी शक्तींच्या कुप्रभावामुळे समतेचे विचार झाकोळले जात आहेत. आर्थिक आणि सामाजिक विषमते विरुद्ध लिहिणाऱ्या-बोलणाऱ्या व्यक्तींना लक्ष्य केले जाते आहे.

लोकशाहीतील अभिव्यक्ती स्वतंत्र्यावर हा एक प्रकारचा हल्ला आहे. त्या विरुद्ध लिहिणारे, बोलणारे यांच्यासाठी निर्भयतेचे वातावरण निर्माण करण्यासाठी स्वराज अभियान ने पुढाकार घेतला आहे. भारत जोडो यात्रेमुळे पुरोगामी समतावादी विचारांना चालना मिळेल आणि लिहिणारा, बोलणारा बुद्धीवादी वर्ग निर्भय बनेल, असे स्वराज अभियानाला वाटते. ललित बाबर : अध्यक्ष स्वराज इंडिया महाराष्ट्र मानव कांबळे: अध्यक्ष स्वराज अभियान महाराष्ट्र

Latest News