लोकभावना लक्षात घेऊनच कस्तुरबा आणि आंबेडकर वसाहतीचा विकास करणार – सनी निम्हण

पुणे : (ऑनलाईन परिवर्तनाचा सामना) महापालिका निवडणुकीच्या प्रचारात रंगत येत आहे. औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांचा प्रचार जोरदार सुरू असून त्यांनी मतदारांशी संवाद साधण्यावर भर दिल्याचे दिसते. भारतीय जनता पक्ष विकास करताना लोकांसोबत असतो यामुळे लोकांच्या भावना समजून घेऊनच कस्तुरबा आणि डॉ. आंबेडकर वसाहतीचा विकास करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या प्रसंगी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.
निम्हण यांच्या प्रचारानिमित्त औंध परिसरात पदयात्रा काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. ही पदयात्रा कस्तुरबा वसाहत,जगदिश नगर,कांबळे वस्ती,संजय गांधी वस्ती,स्पायसर वस्ती या भागात काढण्यात आली होती.
यावेळी मतदारांशी संवाद साधताना चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण म्हणाले, झोपडपट्टी भागांचा विकास करताना तिथे एसआरए करायचं किंवा नाही हे स्थानिक नागरिकांनी ठरवायचे आहे. भाजप हा नेहमी स्थानिक नागरिकांना लोकांच्या भावना समजून घेऊन विकास करण्यावर भर देतो. यामुळे वस्ती विभागात सुधारणा करताना, सोई सुविधा पुरवताना विचारात घेऊ असे त्यांनी नमूद केले.
