मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंकडून अलिबागमधील नुकसानग्रस्त भागाची पाहणी

मुंबई : ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे रायगड जिल्ह्यातील काही भागात नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (5 जून) पाहणी करतील. या पाहणी दौऱ्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंसोबत पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे, अस्लम शेख, अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह हेही रोरो बोटीने अलिबागला रवाना झाले. या पाहणी दौऱ्यानंतर मुख्यमंत्री अलिबाग जिल्हाधिकारी कार्यालयात अधिकाऱ्यांसोबत ते बैठक करतील. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री तसेच पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील भोयरे व पवळेवाडी या ठिकाणी नुकसानीची पाहणी केली. तसेच पवळेवाडी येथील पॉलीहाऊसचीही पाहणी केली. यावेळी आमदार सुनील शेळके, जिल्हाधिकारी नवल किशोर राम उपस्थित होते. निसर्ग चक्रीवादळामुळे अलिबाग तालुक्यात घरांचं आणि शेतीचं मोठं नुकसान झालं. मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे याबाबत आढावा घेतला होता. यावेळी निसर्ग चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे दोन दिवसांत सादर करा, म्हणजे शेतकरी आणि गावकऱ्यांना तातडीने मदत करता येईल, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना केल्या होत्या. रायगड जिल्ह्यात घरांचे जे नुकसान झाले आहे, त्यांच्याकडे स्वयंपाक पाण्याची सोय नाही. त्यांना तातडीने अन्न धान्य पोहचवणे गरजेचे आहे. यंत्रणेने ते काम लगेच हाती घ्यावे. महावितरणने अधिकचे मनुष्यबळ या भागात लावून वीज पुरवठा पहिल्यांदा सुरु करावा. रुग्णालये, दवाखाने यांना वीज पुरवठा सुरु राहणे गरजेचे आहे. नुकसान भरपाई देतांना नागरिकांना विश्वासात घ्या, अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी दिल्या.

Latest News