पंढरपुरात एकाही वारकऱ्याला प्रवेश नाही

पंढरपूर : राज्यावर असलेल्या कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर यंदाच्या आषाढ वारीच्या सोहळ्याला येणारे सर्व पालखी सोहळे रद्द करीत प्रशासनाने अगदी मोजक्या वारकऱ्यांसह मानाच्या सात संतांच्या पादुका हेलिकॉप्टरने आणण्याच्या हालचाली सुरु केल्या असताना या काळात राज्यभरातून एकही वारकऱ्याला शहरात प्रवेश न देण्यासाठी स्थानिक प्रशासनानेही कडक पावले उचलायला सुरुवात केली असून पंढरपुरातील भाविकांच्या निवासासाठी असणारे सर्व 450 मठ, धर्मशाळा, हॉटेल्स व इतर खाजगी ठिकाणांना नोटीस देऊन तपासणीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर आता पंढरपुरात प्रवेशासाठी एकाही नागरिकाला परवानगी न देण्याचे पत्र राज्यातील सर्व जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना पाठवण्यात आले आहे.

वारकरी संप्रदायाचा आषाढी सोहळा हा सर्वात मोठा सोहळा मानला जातो. राज्यभरातून दरवर्षी 18 ते 20 लाख भाविक पंढरपुरात येत असतात. यंदा सर्वत्र कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात होत असल्याने यात्रेला थोडे जरी भाविक आले तर हा प्रसार राज्यभर पसरणारा असल्याने पंढरपुरात एकही वारकऱ्याला प्रवेश न देण्याची तयारी गांभीर्याने प्रशासनाने सुरु केली आहे.

आषाढीला येणारे भाविक पासेस घेऊन थोडे आधीच पंढरपुरात मुक्कामाला येऊ नये यासाठी शहरातील सर्व मठ व धर्मशाळांना प्रशासनाने नोटीस बजावून एकालाही राहण्यास जागा न देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या मठात आणि धर्मशाळेत असणारे मठाधिपती व सेवक यांची सध्या तपासणी पोलीस पथके जाऊन करीत असून प्रत्येक ठिकाणी नेमके कितीजण राहतात याच्या नोंदी गोळा करीत आहेत.

वारी पोहचवण्यासाठी वारकरी अनेक प्रकारे पंढरपुरात दाखल होतात याचा अनुभव चार दिवसापूर्वी झालेल्या निर्जला एकादशीला आला होता. यात नांदेड, लातूर, सांगली, सातारा आणि सोलापुरातून आलेल्या वारकऱ्यांना पोलिसांनी ताब्यात घेऊन क्वारंटाईन करून ठेवले आहे. एवढ्या लांबून हे वारकरी दुचाकीवर पंढरपुरात आले होते. हा धोका आता पत्करायचा नसल्याने शहरातील सर्व निवास स्थळांची तपासणी सुरु करण्यात आली आहे.

त्याचबरोबर इतर जिल्ह्यातून अधिकृत प्रवेश पासेस बंद केल्यानंतर पोलीस शहराची नाकेबंदी करून कोणालाच शहरात या कालावधीत प्रवेश देणार नाहीत. 30 जून पर्यंत सध्या विठ्ठल मंदिर बंदच राहणार असून 1 जुलै रोजी आषाढी एकादशीचा महासोहळा असणार आहे. वारकरी संप्रदायातील बहुतांश महाराजांनी यंदा आषाढी घरीच करण्याचे आवाहन केले असून कोरोनाच्या फैलावास वारकरी संप्रदायावर ठपका येऊ नये अशी भावना संप्रदायाची आहे. आता यामुळे प्रशासनावरील जबाबदारी वाढली असून आषाढी यात्रा होईपर्यंत कोणालाच शहरात प्रवेश करू न देण्याचे कर्तव्य त्यांना पार पाडावे लागणार आहे.

Latest News