मणिपूरमधील अत्याचाराला आळा घालणारं कोणीच नाही का? – रेणुका शहाणे

ऑनलाईन परिवर्तनाचा सामना – इतिहास साक्ष आहे जेव्हा कोण्या एका स्त्रीचं हरण केलं जातं तेव्हा त्याची किंमत समस्त मनुष्यजातीला भरावी लागते. जसे सत्य, तप, पवित्रता आणि दान हे धर्माचे चार चरण आहेत तसंच लोकशाहीचेही विधायक, कार्यपालिका, न्यायपालिका आणि पत्रकारिता हे चार स्तंभ आहेत. लोकशाहीच्या या चारही स्तंभांनी लयबद्धतेने चालणं गरजेचं आहे.

तेव्हाच अमानुष व्यक्तींपासून समाजाचा बचाव होईल.मणिपूरमध्ये दोन महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. तसंच नंतर त्यांच्यावर सामूहिक बलात्कार केल्याची अमानुष घटना घडली.

इतकंच नाही तर त्यांना घेऊन जातानाचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल केला गेला.यावर देशभरातून पडसाद उमटत आहे. अभिनेत्री रेणुका शहाणेनेही या घटनेवर तीव्र संताप व्यक्त केलाय.रेणुका शहाणे ट्वीट करत म्हणाल्या,’मणिपूरमधील अत्याचाराला आळा घालणारं कोणीच नाहीए का? जर तुम्ही त्या दोन महिलांचा व्हिडिओ पाहून हळहळला नसाल तर स्वत:ला माणूस म्हणणं तरी योग्य आहे का,

भारतीय तर पुढची गोष्ट आहे.’हिंसाग्रस्त मणिपूरमध्ये जो व्हिडिओ व्हायरल झालाय तो ४ मे रोजीचा आहे. या महिला कुकी समुदायातील आहेत. त्यांच्यासोबत मैतेई समुदायातील लोकांनी छेडछाड करत त्यांची निर्वस्त्र रस्त्यावरून धिंड काढल्याचा आरोप आहे. घटनेच्या २१ दिवसांनंतर या प्रकरणात पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे. IPC कलमातंर्गत १५३ ए, ३९८, ४२७, ४३६, ४४८, ३०२, ३५४, ३६४, ३२६, ३७६, ३४ खाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीस तक्रारीत म्हटलंय की, जमावाने १ माणसाला मारून टाकले तर ३ महिलांना निर्वस्त्र केले. त्यातील १९ वर्षीय युवतीसोबत गँगरेप करण्यात आला. जेव्हा तिचा भाऊ तिला सोडवण्यासाठी गेला तेव्हा त्यालाही ठार केले. त्यानंतर ३ महिला अज्ञात व्यक्तींच्या मदतीने तिथून पळाल्या. ४ मे रोजी दुपारी ३ च्या सुमारास १ हजार लोक एके रायफल्स आणि हत्यारासह फेनोम गावात घुसले. हिंसक जमावाने अनेक संपत्ती लुटली, घरे जाळली.